बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. ब्रिस्बेन येथे चौथा आणि निर्णायक कसोटी सामना होणार आहे. हा सामना जिंकून चषकावर कब्जा करण्याच्या इराद्यानं दोन्ही संघ मैदानात उतरील. मात्र, भारतीय संघ दुखापतीमुळे बेजार झाला आहे. एकापाठोपाठ एक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.   भारतीय संघातील आतापर्यंत ९ खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. सिडनी कसोटीमध्ये जसप्रीत बुमराह क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यातच आता मयांक आणि आर. अश्विन यांनाही दुखापत झाल्याचं समोर आलं. अशामध्ये संघ व्यवस्थापनाला भारतीय संघ निवडताना अडचण होत आहे. भारतीय संघाचा माजी विस्फोटक खेळाडू विरेंद्र सेहवागनं याच संधीचा फायदा घेत एक मजेशीर ट्विट केलं आहे. यामध्ये त्यानं चौथ्या कसोटीत खेळण्याची तयारी दर्शवत बीसीसीआयला तशी ऑफर दिलं आहे.

सेहवागचं हे ट्विट सध्या तुफान व्हायरल होतं आहे. कारण, हनुमा विहारीचा पर्याय मानला जात असलेला मयांक अगरवालही नेटमध्ये सराव करत असताना जखमी झाला आहे.  त्याशिवाय सिडनी कसोटीत साडेतीन तास झुंज देणाऱ्या अश्विनलाही पाठदुखीचा त्रास वाढला आहे. राहुल, उमेश यादव आणि मोहम्मद शमी याआधीच दुखापग्रस्त झाल्यामुळे मालिकेला मुकले आहेत. या परिस्थितीवर सेहवागनं मजेशीर ट्विट केलं आहे.

काय म्हणाला सेहवाग –

सेहवागनं दुखापतग्रस्त खेळाडूंचा एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच फोटोवरती मजेशीर असं कॅप्शन लिहीत ट्विट केलं आहे. ‘इतके खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. जर ११ जणांची भरती होत नसेल तर ऑस्ट्रेलियाला जायला तयार आहे. बीसीसीआयनं विलगीकरणाचं पाहवं.’ सेगावगचा हा अंदाज अनेकांना आवडला आहे.

१५ जानेवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. हा कसोटी सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्यानं दोन्ही संघ मैदानात उतरतील.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापग्रस्त झालेले खेळाडू –
मोहम्मद शमी, उमेश यादव, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह, मयांक अगरवाल आणि आर. अश्विन