भारत विरुद्ध इंग्लंड पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली आहे. आजपासून हेडिंग्लेवर तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामना जिंकण्याचं दोन्ही संघाचं लक्ष्य आहे. भारताने १-० ने आघाडी घेतल्याने इंग्लंडवर दडपण आहे. हा सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधण्याची इंग्लंडची धडपड असणार आहे. दुसरीकडे भारताने हा सामना जिंकल्यास ३५ वर्षापूर्वीच्या विक्रमाची बरोबरी होणार आहे. यापूर्वी १९८६ मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडला २-० ने पराभूत केलं होतं.

वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे चांगली कामगिरी करू शकले नाही. मात्र तरीही त्यांना तिसऱ्या कसोटी सामन्यात संधी मिळणार आहे. दुसरीकडे नोव्हेंबर २०१९मध्ये कोहलीने अखेरचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो दोनदा चाळिशीत बाद झाला आहे. परंतु आधुनिक क्रिकेटमधील या अव्वल फलंदाजांकडून अपेक्षाही तितक्याच उंचावल्याने टीका होत आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत उजव्या यष्टीबाहेरील सापळ्यात कोहली सापडला. त्यामुळे त्याला आपल्या तंत्रात सुधारणा करावी लागणार आहे. अन्यथा तिसऱ्या कसोटीत फलंदाजी करणे अधिक आव्हानात्मक ठरेल. भारतीय संघ २००२मध्ये हेडिंग्लेवर अखेरचा सामना खेळला होता. त्या सामन्यात भारताने एक डाव आणि ४६ धावांनी संस्मरणीय विजय मिळवला होता. त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी भारत उत्सुक आहे.

रोहित-राहुल लयीत

रोहित शर्मा आणि के. एल. राहुल या सलामीवीरांची कामगिरी भारताच्या धावसंख्येसाठी प्रेरक ठरत आहे. राहुलचा प्रत्येक डावागणिक आत्मविश्वास उंचावत आहे. रोहितसुद्धा लयीत आहे, परंतु चुकीच्या चेंडूवर पूलचा फटका खेळल्याने मालिकेत त्याचा दोनदा घात केला आहे चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचे अपयश भारतासाठी चिंताजनक ठरत होते. परंतु लॉडर्समध्ये यांनी जवळपास ५० षटके किल्ला लढवून टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.

वेगवान चौकडीच कायम

हेडिंग्लेमधील वातावरण हे थंड असल्यामुळे वेगवान गोलंदाजांचेच खेळपट्टीवर वर्चस्व दिसून येईल. या परिस्थितीत भारत वेगवान चौकडीचीच रणनीती आखून, पुन्हा रविचंद्रन अश्विनला विश्रांती देईल. शार्दूल ठाकूर दुखापतीतून सावरला असला तरी कोहली लॉडर्सवरील विजयी वेगवान माऱ्यात बदल करणार नाही. पहिल्या कसोटीत वगळलेल्या इशांत शर्माने लॉर्ड्सवर लक्ष वेधले. त्यामुळे अनुभवी इशांतला शार्दूलपेक्षा प्राधान्य दिले जाईल.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयांक अगरवाल, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रित बुमरा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, के. एल. राहुल, वृद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.

इंग्लंड : जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जोनाथन बेअरस्टो, रॉली बन्र्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, साकिब मेहमूद, डेव्हिड मलान, क्रेग आव्हर्टन, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन.