लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर भारतीय क्रिकेट संघाने विजयी तिरंगा फडकावला आहे. अंत्यत रोमांचक ठरलेल्या चौथ्या कसोटीत विराटसेनेने इंग्लंडला १५७ धावांनी हरवले आणि ५० वर्षांचा दुष्काळ संपवला. पाचव्या दिवसअखेर इंग्लंडला २९१ धावांची गरज होती, शिवाय त्यांच्याकडे संपूर्ण संघ फलंदाजीसाठी शिल्लक होता. पण भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त आक्रमण करत इंग्लंडच्या फलंदाजांना एकामागोमाग एक तंबूत धाडले. लंचनंतर खेळपट्टीने आपला रंग बदलला आणि जडेजासह बुमराहने आपले कौशल्य दाखवायला सुरुवात केली. १९७१मध्ये भारताने अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात या मैदानावर शेवटचा कसोटीविजय नोंदवला होता. भारताने या विजयासह मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारताकडून जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर उमेश यादवने ३ गडी बाद केले. आता कसोटी मालिकेतील पाचवा सामना अनिर्णित किंवा भारताने जिंकल्यास मालिका जिंकणार आहे. तर इंग्लंडपुढे आता फक्त मालिका वाचवण्याचं आव्हान आहे. त्यामुळे त्यांना पाचवा कसोटी सामना जिंकावा लागणार आहे.