भारताचा कप्तान रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या नव्या इनिंगची दमदार सुरुवात केली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ५ गडी राखून विजय नोंदवला. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि मार्क चॅपमन यांनी अर्धशतके ठोकली. या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकात ६ बाद १६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवने अर्धशतक ठोकले तर, रोहितने ४८ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात १० धावांची गरज असताना पदार्पणवीर व्यंकटेश अय्यर आणि ऋषभ पंत यांनी चौकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सूर्यकुमारला सामनावीर पुरस्कार मिळाला. या विजयासह भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारताचा डाव

रोहित शर्मा आणि केएल राहुल या भारताच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केल्यानंतर फिरकीपटू मिचेल सँटनरने न्यूझीलंडला पहिले यश मिळवून दिले. त्याने राहुलला चॅपमॅनकरवी झेलबाद केले. त्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. सूर्या आणि रोहितने दुसऱ्या गड्यासाठी ५९ धावांची भागीदारी फलकावर लावली. अर्धशतकाला दोन धावांची गरज असताना रोहित माघारी परतला. रोहितने आपल्या खेळीत ५ चौकार आणि २ षटकार ठोकले. त्यानंतर सूर्याने धावगती वाढवली. संघाला विजयाजवळ पोहोचवले असताना तो बाद झाला. त्याने ६ चौकार आणि ३ षटकारांसह ६२ धावा केल्या. संघात कमबॅक केलेला श्रेयस अय्यरला मोठे फटके खेळता आले नाहीत. तो अवघ्या पाच धावांची भर घालून माघारी परतला. दोन चेंडू शिल्लक असताना पंतने मिशेलला चौकार ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केले. न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने २ बळी घेतले.

न्यूझीलंडचा डाव

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पहिल्या षटकात सलामीवीर डॅरिल मिशेलची शून्यावर दांडी गुल करत न्यूझीलंडला पहिलाच हादरा दिला. त्यानंतर न्यूझीलंडचा दुसरा सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि मार्क चॅपमन यांनी संघाला सावरले. दुसऱ्या गड्यासाठी या दोघानी १०९ धावांची भागीदारी केली. हे दोघे संघाला मोठी धावसंख्या गाठून देणार असे वाटत असताना रोहितने अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनच्या हाती चेंडू सोपवला. अश्विनने एकाच षटकात चॅपमन आणि त्यानंतर आलेल्या ग्लेन फिलिप्सला (०) तंबूत पाठवले. चॅपमनने ६ चौकार आणि २ षटकारांसह ६३ धावा केल्या. दुसऱ्या बाजूने गप्टिलने आक्रमक फलंदाजी केली. संघाच्या दीडशे धावा फलकावर लावल्यानंतर वेगवान गोलंदाज दीपर चहरने गप्टिलला माघारी पाठवले. गप्टिलने ३ चौकार आणि ४ षटकारांसह ७० धावा केल्या. गप्टिलनंतर न्यूझीलंडचे इतर फलंदाज ढेपाळले. भारताने शेवटच्या चार षटकात भेदक मारा केला. न्यूझीलंडला २० षटकात ६ बाद १६४ धावा करता आल्या. भारताकडून भुवनेश्वर आणि अश्विनने प्रत्येकी २ बळी घेतले.

जयपूरच्या या मैदानावर पहिल्यांदाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेला. याआधी २०१३ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध या मैदानावर एकदिवसीय सामना खेळला होता. आयपीएल २०२१मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून दमदार कामगिरी केलेला फलंदाज व्यंकटेश अय्यरने आज भारतासाठी पदार्पणाचा टी-२० सामना खेळला.

हेही वाचा – PHOTOS : बेटा मौज कर दी..! हार्दिक पंड्याच्या ‘या’ ५ घड्याळांची किंमत ऐकून तोंडात घालाल बोटे!

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड – मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, टिम साऊदी ( कर्णधार), टॉड अॅस्टल, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.