भारत-न्यूझीलंडमध्ये कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर रंगलेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात चाहत्यांना रंगतदार क्रिकेटचा थरार पाहायला मिळाला. अंधुक प्रकाश आणि एक विकेटच्या अडथळ्यामुळे भारताला विजय हिरावला गेला. पाचव्या दिवसाचा खेळ संपायला एक तास शिल्लक असताना रचिन रवींद्र आणि एजाज पटेल यांनी झुंजार फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना विकेट घेऊ दिली नाही. शेवटी पंचानी दिवसाचा खेळ संपल्याचा निर्णय घेतल्यामुळे दोन्ही संघांमधील हा चित्तथरारक सामना ड्रॉ राखला. पदार्पणात शतक ठोकणाऱ्या श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्कार मिळाला. आता मालिकेचा दुसरा कसोटी सामना ३ डिसेंबरपासून मुंबईत रंगणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूझीलंडचा दुसरा डाव

पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केलेला विल यंग दुसऱ्या डावात जास्त योगदान देऊ शकला नाही. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने यंगला (२) बाद केले. त्यानंतर नाईट वॉचमन विल सोमरविलेला सोबत घेत लॅथमने किल्ला लढवला. या दोघांनी लंचपर्यंत संघाला सावरले. लंचंनंतर वेगवान गोलंदाज उमेश यादवने सोमरविलेचा अडथळा दूर केला. शुबमन गिलने त्याचा अप्रतिम झेल घेतला. सोमरविलेने ३६ धावा केल्या आणि लॅथमसोबत ७६ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर कप्तान केन विल्यमसन मैदानात आला. या दोघांनी संघाचे शतक फलकावर लावले. लॅथमने आपला फॉर्म कायम राखत अजून एक अर्धशतक ठोकले. अर्धशतकानंतर लॅथम अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ५२ धावांची खेळी केली. अनुभवी फलंदाज रॉस टेलर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. रवींद्र जडेजाने त्याला बोल्ड केले. चहापानानंतर जडेजाने न्यूझीलंडचा कप्तान केन विल्यमसनला (२४) पायचीत पकडले. तर अक्षरने नव्याने फलंदाजीला आलेल्या हेन्री निकोल्सला माघारी धाडत न्यूझीलंडची अवस्था खिळखिळी केली. शेवटचा एक तास बाकी असताना जडेजाने जेमीसनच्या रुपात न्यूझीलंडला आठवा धक्का दिला. त्यानंतर मात्र रचिन रवींद्र आणि एजाज पटेल यांनी निर्धारित वेळेत संयमी फलंदाजी करत भारताला विकेट मिळू दिली नाही. ९८ षटकात ९ बाद १६५ धावांवर पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. रवींद्रने तब्बल ९१ चेंडूंचा सामना करत १८ तर पटेलने २३ चेंडूंचा सामना करत २ धावा केल्या. भारताकडून जडेजाने ४ तर अश्विनने ३ बळी घेतले.

भारताचा दुसरा डाव

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने भारताचा सलामीवीर शुबमन गिलला (१) स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि मयंक अग्रवाल यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तेसुद्धा अपयशी ठरले. जेमीसनने पुजाराला (२२) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर टिम साऊदीने पुन्हा एकदा भेदक गोलंदाजी करत मयंकला (१७) आणि रवींद्र जडेजाला एकाच षटकाच बाद केले. ५१ धावांत ५ गडी गमावल्यानंतर श्रेयस अय्यर आणि रवीचंद्रन अश्विन यांनी थोडा आधार दिला. या दोघांनी संघाची धावसंख्या शतकीपार केली. जेमीसनने अश्विनला बोल्ड करत ही भागीदारी मोडली. अश्विनने ३२ धावांचे योगदान दिले. त्यानंतर चहापानापर्यंत श्रेयसने लढा दिला. त्याने ८ चौकार आणि एका षटकारासह ६५ धावांची खेळी केली. साऊदीने श्रेयसचा काटा काढला. श्रेयस बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा न्यूझीलंडसमोर उभा राहिला. त्याने अर्धशतकी खेळी करत भारताची आघाडी वाढवली. साहाने आधी श्रेयससोबत नंतर अक्षर पटेलसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. ८१ षटकात ७ बाद २३४ धावांवर भारताने आपला दुसरा डाव घोषित केला. साहाने ४ चौकार आणि एका षटकारासह ६१ तर पटेलने २८ धावांची नाबाद खेळी केली. न्यूझीलंडकडून साऊदी आणि जेमीसन यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

न्यूझीलंडचा पहिला डाव

न्यूझीलंडच्या पहिल्या डावात टॉम लॅथम आणि विल यंग यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी भारतीय गोलंदाजांना कोणतीही संधी न देता १५१ धावांची भागीदारी उभारली. यंगचे शतक हुकले. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने यंगला यष्टीपाठी झेलबाद केले. यंगने १५ चौकारांसह ८९ धावा केल्या. त्यानंतर कप्तान केन विल्यमसनसह लॅथम उभा राहिला. वैयक्तिक १८ धावांवर असताना विल्यमसनला वेगवान गोलंदाज उमेश यादवने पायचीत पकडले. लंचनंतर अक्षर पटेलने आपल्या फिरकीत तीन फलंदाजांना अडकवले. त्याने रॉस टेलर (११), हेन्री निकोल्स (२) आणि सलामीवीर लॅथमला (९५) तंबूत पाठवले. साहाच्या बदली खेळत असलेल्या श्रीकर भरतने उत्कृष्ट यष्टीरक्षण करत महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने लॅथमला यष्टीचीत केले. लॅथमने १० चौकारांसह ९५ धावा केल्या. नंतर आलेला रचिन रवींद्र जडेजाचा बळी ठरला. अक्षरने टॉम ब्लंडेल आणि त्यानंतर टिम साऊदीला बाद करत आपले पाच बळी पूर्ण केले. अश्विनने विल सोमरविलेला बाद करत न्यूझीलंडचा पहिला डाव १४२.३ षटकात २९६ धावांवर संपुष्टात आणला. अश्विनने ३ बळी घेतले.

हेही वाचा – ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचा ‘गंभीर’ अपघात; मुलासोबत बाईक चालवताना…

भारताचा पहिला डाव

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या भारताचा पहिला डाव १११.१ षटकात ३४५ धावांवर आटोपला. सलामीवीर शुबमन गिलची ५२ धावांची खेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू होती. गिलने ५ चौकार आणि एक षटकार ठोकला. वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने त्याला बोल्ड केले. गिलचा सहकारी मयंक अग्रवाल (१३) स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर आलेले चेतेश्वर पुजारा (२६), कर्णधार अजिंक्य रहाणे (३५) यांनी छोटेखानी खेळी करत भारतासाठी धावा जोडल्या. श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी १२१ धावांची भागीदारी रचली. श्रेयसने पदार्पणाच्या सामन्यात छाप सोडली आणि नाबाद शतक झळकावले. तर जडेजाने ५० धावांची खेळी केली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीने जडेजाला माघारी धाडले. जडेजाने ६ चौकारांसह ५० धावा केल्या. त्यानंतर अय्यरने वृद्धिमान साहाला सोबत घेत धावा जोडल्या. अय्यरने जेमीसनच्या गोलंदाजीवर शतक झळकावले. पदार्पणात शतक झळकावणारा श्रेयस १६वा भारतीय ठरला. पुढच्या दोन षटकात भारताने साहाला (१) गमावले. साऊदीने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. भारताच्या तीनशे धावा फलकावर लागल्यानंतर श्रेयस माघारी परतला. साऊदीने त्याला १०५ धावांवर तंबूत धाडले. श्रेयसने १३ चौकार आणि २ षटकार ठोकले. श्रेयसनंतर अश्विनने किल्ला लढवला. अश्विनने ५ चौकारांसह ३८ धावा केल्या. पटेलने इशांत शर्माला पायचीत पकडत भारताचा डाव संपुष्टात आणला. न्यूझीलंडकडून साऊदीने ६९ धावांत ५, जेमीसनने ३ तर पटेलने २ बळी घेतले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs new zealand test series first test at kanpur day five adn
First published on: 29-11-2021 at 10:19 IST