न्यूझीलंड टी २० वर्ल्डकप संपल्यानंतर थेट भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडसोबत तीन टी २० आणि दोन कसोटी सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. जयपूर, रांची आणि कोलकाता येथे टी २० सामने असतील. तर कसोटी सामने कानपूर आणि मुंबई होणार आहेत. करोनामुळे भारतात गेल्या काही महिन्यात एकही मालिका झालेली नाही. करोनामुळे आयपीएल आणि वर्ल्डकपचं आयोजनही युएईत करावं लागलं होतं. दुसरीकडे पाकिस्तान आणि न्यूझीलंडने पराभूत केल्यानं भारताचं वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आलं होतं. त्यामुळे या मालिकेत न्यूझीलंडला पराभूत करत हिशोब चुकता करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

कधी कुठे होणार सामने?

  • टी २० भारत विरुद्ध न्यूझीलंड- १७ नोव्हेंबर, संध्याकाळी ७.३० वाजता, जयपूर
  • टी २० भारत विरुद्ध न्यूझीलंड- १९ नोव्हेंबर, संध्याकाळी ७.३० वाजता, रांची
  • टी २० भारत विरुद्ध न्यूझीलंड- २१ नोव्हेंबर, संध्याकाळी ७.३० वाजता, कोलकाता
  • पहिला कसोटी सामना- २५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर, कानपूर
  • दुसरा कसोटी सामना- ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर, मुंबई

न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टी २० संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. तर संघात ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर. अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराजची निवड करण्यात आली आहे. विराट कोहलीला टी २० मालिकेसाठी आराम देण्यात आला आहे. पुणेकर असलेल्या आणि चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडला संघात स्थान मिळालं आहे. ऋतुराज गायकवाडची आयपीएल २०२१ स्पर्धेत बॅट चांगलीच तळपली होती. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यासारख्या वरिष्ठ खेळाडूंना आराम दिला आहे. हर्षल पटेल, वेंकटेश अय्यार यांना संघात स्थान मिळेल, असं सांगण्यात येत आहे. हर्षल पटेलने आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तर श्रेयस अय्यरचं संघात पुनरागमन झालं आहे. दीपक चाहर आणि युजवेंद्र चहल यांना संधी मिळाली आहे.