भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग येथे खेळवला जात आहे. खराब फॉर्ममुळे टीकेचा सामना करत असलेल्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अर्धशतके ठोकत भारतीय संघाला संकटातून बाहेर काढले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन मिळवून दिलं आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पुजाराने त्याच्या आणि रहाणेच्या फॉर्मबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे. पुजारा आणि रहाणेचे अर्धशतक आणि दोघांमधील १११ धावांच्या भागीदारीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २४० धावांचे लक्ष्य ठेवले. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला दडपण जाणवत आहे का असे विचारले असता दिग्गज सुनील गावस्कर यांनी दुसरा डाव ही त्याची शेवटची संधी असू शकते, असे म्हटले होते. मात्र पुजाराने दिवसाचा खेळ संपल्यावर यावर उत्तर दिले आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला संघ व्यवस्थापनाचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही सनीभाईंकडून नेहमीच शिकत असतो आणि जेव्हाही मी त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी नेहमीच साथ दिली आहे, असे पुजाराने म्हटले. “हो, असे काही वेळा होते जेव्हा तुम्ही खराब फॉर्ममधून जात असता, त्यामुळे प्रश्न निर्माण होतात पण आम्ही आत्मविश्वासू खेळाडू आहोत. मी आणि अजिंक्य, आम्हाला माहित आहे की आम्ही आमच्या खेळासाठी कठोर परिश्रम घेत आहोत आणि एक म्हण आहे 'फॉर्म तात्पुरता आहे पण 'क्लास' कायम आहे' आणि ती इथे योग्य बसते,” असे पुजाराने म्हटले आहे. दरम्यान, अजिंक्य रहाणे (७८ चेंडूंत ५८ धावा) आणि चेतेश्वर पुजारा (८६ चेंडूंत ५३ धावा) या संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडूंनी बुधवारी अर्धशतकी खेळी साकारून स्वत:ची कारकीर्द वाचवण्यासह भारतालाही सावरले. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी संयमी फलंदाजी केल्यामुळे दुसरा कसोटी क्रिकेट सामना निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स मैदानावर सुरू असेल्या या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा आफ्रिकेने ४० षटकांत २ बाद ११८ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात शार्दूल ठाकूरने एडिन मार्करमला (३१), तर रविचंद्रन अश्विनने कीगन पीटरसनला (२८) पायचीत पकडले. कर्णधार डीन एल्गर (खेळत आहे ४६) मात्र एक बाजूने तग धरून असून त्याच्या साथीला रॅसी व्हॅन दर दुसेन ११ धावांवर खेळत आहे. त्यामुळे चौथ्या दिवशीच सामन्याचा निकाल लागणार हे जवळपास स्पष्ट झाले असूून आफ्रिका उर्वरित १२२ धावा करणार की भारताचे गोलंदाज शिल्लक आठ बळी गारद करून ऐतिहासिक मालिका विजयावर शिक्कामोर्तब करणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.