भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली सध्या कठीण काळातून जात आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात त्याने आतापर्यंत अतिशय खराब कामगिरी केली आहे. राजस्थानविरोधातील सामन्यातही तो अवघ्या नऊ धावा करुन झेलबाद झाला आहे. दरम्यान त्याचे सातत्याचे अपयश आणि खराब खेळ याबद्दल बीसीसीयाने चिंता व्यक्त केली आहे. दक्षिण अफ्रिकसोबतच्या टी-२० मालकेत विराटचा समावेश करावा का, याबाबत निवड समिती आणि बीसीसीआयकडून विचारविनिमय केला जात आहे. त्यामुळे आगामी पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत विराटला डच्चू मिळणार का? असा प्रश्न विचारला जातोय.

हेही वाचा >> “कोहलीने आता ब्रेक घ्यावा, तेच शहाणपणाचं ठरेल,” रवी शास्त्रींचा विराटला सल्ला

बीसीसीआयच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली असून इन्साईड स्पोर्टने सविस्तर वृत्त दिले आहे. “त्याने भारताची सेवा केलेली आहे. मात्र मागील काही काळापासून त्याचा फॉर्म राष्ट्रीय निवडकर्ते तसेच बीसीसीआयसाठी चिंतेचा विषय ठऱत आहे. आम्ही निवड समितीच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करत नाही. निवडकर्त्यांनाच विराट आणि इतरांबद्दल निर्णय घ्यायचा आहे. आम्ही त्याबद्दल काही मत मांडू शकत नाही. मात्र विराटसोबत जे घडत आहे, त्याबाबत निवडकर्ते निश्चित चिंतेत आहेत,” असे या अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>IPL 2022: “शाहरुख खानने मला केकेआरकडून खेळण्यासाठी फोन केला होता”; माजी पाकिस्तानी खेळाडूचा खुलासा

विराटला डच्चू मिळणार का?

विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेसोबतच्या मालिकेत संधी दिली जाणार का? याबाबत विचारले असता निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे विराट आगामी टी-२० मालिकेत खेळणार का? हे अद्याप सांगणे कठीण आहे.

हेही वाचा >> रिकी पाँटिंगने दिल्ली कॅपिटल्सचा सामना पाहताना टिव्ही रिमोट का तोडले?

दरम्यान, येत्या ९ जूनपासून भारत आणि दक्षिण आफ्रिक यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. या स्पर्धेसाठी राष्ट्रीय निवड समितीने खेळाडूंचा अभ्यास करणे सुरु केले आहे. या मालिकेसाठी सध्या फॉर्ममध्ये असणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विराट कोहली सध्या कठीण काळातून जातोय. मागील १०० डावांमध्ये कोहली एकदाही शतकी खेळी करु शकलेला नाही. आयपीएलमध्येही त्याने खराब खेळी केली आहे.

हेही वाचा >> RR vs RCB : रियान पराग आणि हर्षल पटेलमध्ये मैदानातच खडाजंगी; सामन्यानंतरही वाद कायम

राजस्थानसोबतच्या सामन्याअगोदर तो सलग दोन वेळा गोल्डन डकवर शून्यावर बाद झालाय. तर राजस्थानविरोधातील सामन्यात सलामीला येऊनही तो खास कामगिरी करु शकलेला नाही. अवघ्या ९ धावांवर तो झेलबाद झालाय. कोहलीच्या याच कामगिरीमुळे बीसीसीआयकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच राष्ट्रीय निवड समितीतील अधिकाऱ्यांनीही विराटच्या निवडीसंदर्भात विचारविनिमय करण्यास सुरु केले आहे.