भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ६ फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे तिन्ही सामने होणार आहेत. गेल्या वर्षी या स्टेडियममध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाही. गुजरात क्रिकेट असोसिएशनने याबाबत माहिती दिली. सध्याची परिस्थिती पाहता सर्व सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जातील. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य संघाने हा निर्णय घेतला आहे. या मालिकेतील पहिला सामना ६ फेब्रुवारीला होणार असून हा सामना ऐतिहासिक ठरणार आहे. भारताचा हा १०००वा एकदिवसीय सामना असेल. भारतीय संघ १००० एकदिवसीय सामने खेळणारा पहिला संघ ठरणार आहे. दुसरा सामना ९ फेब्रुवारीला होणार आहे. तिसरा सामना ११ फेब्रुवारीला होणार आहे. हेही वाचा - Budget 2022 : खेळाडूंसाठी खूशखबर..! क्रीडा विभागासाठी ३०० कोटींची वाढ वेस्ट इंडिजचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटने आपल्या खेळाडूंचा विमानतळावरील फोटो ट्वीट करून याबाबत माहिती दिली. या मालिकेसाठी भारतीय संघ आधीच अहमदाबादला पोहोचला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सोमवारी अहमदाबादला पोहोचली. अहमदाबादमध्ये एकदिवसीय मालिका खेळल्यानंतर दोन्ही संघ कोलकात्याला रवाना होतील. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल.