टी-२० र्ल्डकप २०२१ स्पर्धेमध्ये पाकिस्तानने इतिहासात प्रथमच भारताचा पराभव केला. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक गमावली आणि संघाला १० गडी राखून पराभव पत्करावा लागला. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने एका महिन्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ पाकिस्तानकडून पराभूत झाला, कारण नाणेफेकीपूर्वी त्यांच्या खेळाडूंवर दबाव होता, असे इंझमामने म्हटले. त्याने यावेळी ‘भयभीत’ या शब्दाचाही उल्लेख केला.

५१ वर्षीय इंझमाम पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर म्हणाला, “जेव्हा मी नाणेफेक दरम्यान विराट कोहली आणि बाबर आझमला पाहिले तेव्हा हे स्पष्ट झाले की भारतीयांवर खूप दबाव आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने बाद करण्यापूर्वीच भारतावर दबाव होता.”

हेही वाचा – IND vs NZ : श्रेयस अय्यरचं शतक आणि जाफरची भन्नाट पोस्ट..! स्वत: लाच ट्रोल करत म्हणाला…

इंझमाम म्हणाला, “सामन्यापूर्वीच ते दडपणाखाली होते आणि त्यामुळेच त्यांचा १० विकेट्सने पराभव झाला. तुम्ही त्याचे शारीरिक हावभाव पाहू शकता. ते भयभीत दिसत होते, तर पाकिस्तानचे खेळाडू सामना जिंकण्यासाठी अधिक आत्मविश्वासू आणि उत्साही होते. विश्वचषकाच्या सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव होण्याची ही पहिलीच वेळ होती.”

”भारत सुरुवातीपासूनच विजेतेपदाचा दावेदार होता, पण खूप दबावामुळे त्यांना विजयापासून दूर ठेवले. भारतीय संघ कधीही टी-२० विश्वचषकात आपल्या खेळाडूंप्रमाणे खेळत नाही. ते एक चांगले टी-२० संघ आहेत यात शंका नाही. गेल्या २-३ वर्षातील त्याची कामगिरी पाहिली तर खरोखरच खूप छान प्रवास झाला आहे”, असेही इंझमामने म्हटले.