भारताचा मधल्या फळीतील मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. श्रेयस पुन्हा पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आगामी टी-२० वर्ल्डकपपर्यंतचा काळ लागू शकतो. २६ वर्षीय श्रेयसला इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर ९ एप्रिल रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर ४-५ आठवड्यांपर्यंत क्रिकेट उपक्रमांपासून दूर राहील अशी अपेक्षा होती. एका वृत्तानुसार, कर्नाटकात करोना प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने बंगळुरूस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) कोणतेही रिकव्हरी सत्र झाले नाही. श्रेयसच्या रिकव्हरी प्रक्रियेस उशीर झाला आहे. तो एनसीएला जाणार होता. पण कर्नाटकात करोना प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे ते पुढे ढकलले गेले. श्रेयस मुंबईतील बीसीसीआयच्या वैद्यकीय विभागाच्या सल्ल्याने रिकव्हरी सत्रात जात आहे, असे सूत्रांनी सांगितले. Work in progress Watch this space pic.twitter.com/HyVC8036yh — Shreyas Iyer (@ShreyasIyer15) May 13, 2021 खांद्याच्या शस्त्रक्रियेनंतर हळूहळू पूर्णपणे तंदुरुस्त होत असल्याचे श्रेयसने एका व्हि़डिओच्या माध्यमातून सांगितले. आयपीएलच्या उर्वरित सामन्यात श्रेयस उपलब्ध असण्याची शक्यता आहे. आगामी टी-२० वर्ल्डकपच्या अनुषंगाने भारतीय संघासाठी श्रेयस अय्यर महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. आता निलंबित आयपीएल सप्टेंबरमध्ये पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तो दिल्ली कॅपिटल्ससाठी उर्वरित सामने खेळताना दिसू शकतो. त्यामुळे श्रेयस अय्यरला जुलैमध्ये होणाऱ्या श्रीलंका दौर्याच्या बाहेर राहावे लागेल. याशिवाय रॉयल लंडन कपमध्ये तो लँकशायरकडूनही खेळू शकणार नाही.