ऑस्ट्रेलियाकडून शनिवारी सहा गडी राखून पराभूत झाल्यानंतर ‘आयसीसी’ महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारताची उपांत्य फेरीची वाट बिकट झाली आहे. विश्वचषकातील विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करणारा मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा संघ हा उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला आहे. कर्णधार मिताली राज (९६ चेंडूंत ६८ धावा), यास्तिका भाटिया (८३ चेंडूंत ५९ धावा) आणि हरमनप्रीत कौर (४७ चेंडूंत नाबाद ५७ धावा) यांच्या अर्धशतकी खेळींमुळे भारताने ७ बाद २७७ धावसंख्या उभारली. भारताच्या डावात मिताली राज आणि यास्तिका भाटियाने तिसऱ्या गडय़ासाठी १३० धावांची भागीदारी रचली. मग ऑस्ट्रेलयिाच्या डावात सलामीची फलंदाज एलिसा हिली (६५ चेंडूंत ७२ धावा) आणि राशेल हेन्स (५२ चेंडूंत ४३ धावा) यांनी १२१ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली; नंतर लॅनिंगने (१०७ चेंडूंत ९७ धावा) संघाचा विजय सुनिश्चित केला. झुलन गोस्वामीच्या शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाला आठ धावांची आवश्यकता होती; पण बेथ मूनीने (२० चेंडूंत नाबाद २० धावा) तीन चेंडूंमध्येच विजयावर शिक्कामोर्तब केले.