सलामीवीर डॅनिली वॅटने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर तिरंगी टी-२० मालिकेत इंग्लडच्या महिला संघाने भारतीय महिला संघावर ७ गडी राखून विजय मिळवला आहे. स्मृती मंधाना (४० चेंडूत ७६ धावा), मिताली राज (४३ चेंडूत ५३ धावा) यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर १९९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. दरम्यान इंग्लंडविरुद्ध आजच्या सामन्यात भारताने उभारलेली १९८ ही धावसंख्या त्यांची टी-२० क्रिकेटमधली सर्वोत्तम धावसंख्या मानली जात आहे.

भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सलामीवीर डॅनिली वॅटने आक्रमक खेळी केली. डॅनिलीने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत भारतीय संघाने दिलेलं आव्हान सहज पार केलं. डॅनिलीने सलामीच्या जोडीसाठी ६१ धावांची भागीदारीही केली. आजच्या सामन्यात डॅनिलीने ६४ चेंडूंमध्ये १२४ धावा काढल्या. महिला टी-२० क्रिकेटमधलं डॅनिलीचं हे दुसरं शतक ठरलं.

भारतीय जलदगती गोलंदाज झुलन गोस्वामीने सलामीवीर स्मिथला बाद करत इंग्लंडची जमलेली जोडी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र डॅनिलीने अन्य फलंदाजांसोबत भागीदारचं रचत भारताचे सामन्यात पुनरागमन करण्याचे मनसुबे उधळून लावले. याआधी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना स्मृती मंधाना आणि मिताली राजने भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. मिताली राज आणि वेदा कृष्णमुर्ती लागोपाठ माघारी परतल्यानंतर स्मृती मंधानाने हरमनप्रीत कौर व पुजा वस्त्राकरच्या साथीने भारताचा डाव सावरला. मात्र गोलंदाजांच्या अपयशामुळे भारतीय संघाला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला.