India Women’s won Gold at Asian Games 2023: हांगझाऊ येथे सुरू असलेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक पटकावले आहे. सुवर्णपदकाच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर ११७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने २० षटकांत सात गडी गमावून ११६ धावा केल्या. स्मृती मंधांनाने सर्वाधिक ४६ धावांची खेळी खेळली. तर जेमिमा रॉड्रिग्जने ४२ धावा केल्या.
प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून ९७ धावाच करू शकला. भारताकडून तीतस साधूने तीन आणि राजेश्वरी गायकवाडने दोन विकेट्स घेत टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अशाप्रकारे टीम इंडियाने अंतिम सामना १९ धावांनी जिंकून सुवर्णपदक पटकावले. तर, तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा धक्कादायक पराभव करून कांस्यपदक जिंकले.
टीम इंडियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच सुवर्ण पदकावर नाव कोरले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधांनाला भावना अनावर झाल्या. तिने एएनआयशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले. स्मृती म्हणाली, “हे सुवर्णपदक आमच्यासाठी खूप खास आहे. आम्ही हे टोकियो ऑलिम्पिकमध्ये टीव्हीवर पाहिले होते. नीरज चोप्राने जेव्हा सुवर्णपदक जिंकले तेव्हा माझी एक मॅच होती त्यावेळी भारताचे राष्ट्रगीत वाजले आणि तिरंगा राष्ट्रध्वज दिमाखात फडकवला होता. तसचं काहीसं आज मला वाटत होतं. ”
डावखुरी फलंदाज स्मृती पुढे म्हणाली की, “जेव्हा आपण सुवर्णपदक एका मोठ्या क्रीडा स्पर्धेत जिंकतो तो अनुभवच खूप वेगळा असतो. ज्यावेळी आम्हाला सुवर्णपदक देण्यात आले तेव्हा तो क्षण खूप खास होता. राष्ट्रगीतावेळी आमच्या डोळ्यात अश्रू आले…भारतीय दलाच्या पदकतालिकेत आपण योगदान देऊ शकलो याचा खरोखर आनंद झाला…गोल्ड मेडल हे गोल्ड मेडल असते…आम्ही आज आमचे सर्वोत्तम दिले याचा खरोखर आनंद आहे.”
भारतीय डाव
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शफाली वर्मा १५ चेंडूत ९ धावा करून बाद झाली. यानंतर स्मृतीने जेमिमासोबत दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. रणवीराने ही भागीदारी तोडली. त्याने मंधांनाला बाद केले. मंधांनाने ४५ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४६ धावांची खेळी केली. ऋचा घोष नऊ धावा करून बाद झाली आणि कर्णधार हरमनप्रीत कौर दोन धावा करून बाद झाली आणि पूजा वस्त्राकर दोन धावा करून बाद झाली. जेमिमाह रॉड्रिग्सने ४० चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ४२ धावांची खेळी केली. दीप्ती आणि अमनजोत प्रत्येकी एक धाव काढत नाबाद राहिले. श्रीलंकेकडून उदेशिका प्रबोधनी, सुगंधिका कुमारी आणि इनोका रणवीराने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
श्रीलंकेचा डाव
प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाची सुरुवातही खराब झाली. तितस साधूने चमकदार कामगिरी करत चामरी अटापट्टू (१२), अनुष्का संजीवनी (१) आणि विश्मी गुणरत्ने (०) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर हसिनी परेरा आणि निलाक्षी डी सिल्वा यांनी चौथ्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी केली. पूजाने निलाक्षीला (२३) बाद करून ही भागीदारी तोडली. राजेश्वरीने हसिनीला (२५) बाद केले. दीप्तीने ओशादी रणसिंघे (१९), देविका वैद्यने कविशा दिलहारी (५) आणि राजेश्वरीने सुगंधिका कुमारीला बाद करत श्रीलंकेच्या आशा संपुष्टात आणल्या. भारताकडून टिटसने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर राजेश्वरीने दोन गडी बाद केले. दीप्ती, पूजा आणि देविका यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian womens team won the gold medal for the first time in asian games at this time leading batsman smriti mandhana got emotional avw