नवनीत कौरच्या दोन गोलच्या जोरावर भारताच्या महिला हॉकी संघाने अखेरच्या पाचव्या लढतीत ३-० असा विजय मिळवत न्यूझीलंड दौऱ्याची यशस्वी सांगता केली. भारताने पाच लढतींपैकी तीन सामने जिंकत यश मिळवले.

भारताला या सामन्यात पहिल्या दोन सत्रांत गोल करण्यात अपयश आले होते. मात्र नवनीतने ४५व्या आणि ५८व्या मिनिटाला गोल नोंदवले आणि शर्मिलाने ५४व्या मिनिटाला गोल केला. भारताने मालिकेत न्यूझीलंड डेव्हलपमेंट संघाविरुद्धची सलामीची लढत ४-० अशा दणदणीत फरकाने जिंकली होती. मात्र भारताने न्यूझीलंड वरिष्ठ संघाविरुद्धची दुसरी लढत १-२ अशी आणि तिसरी लढत ०-१ फरकाने गमावली. भारताला चौथ्या लढतीत ग्रेट ब्रिटनवर १-० असा विजय नोंदवला.

टोक्यो ऑलिम्पिकची तयारी म्हणून न्यूझीलंड दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘‘न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या लढतीत तीन गोल करता आले या कामगिरीबद्दल आनंद आहे. नेमक्या कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत याचा अंदाज या दौऱ्यामुळे आला,’’ असे भारताच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक शोएर्ड मरिन यांनी म्हटले.