विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आयपीएलच्या बाराव्या हंगामात पहिल्या विजयाची नोंद केली आहे. मोहालीच्या मैदानात विराटच्या संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबवर ८ गडी राखून मात केली. या हंगामात RCB ने सलग ६ सामने गमावल्यामुळे शनिवारच्या सामन्यात विजय मिळवणं बंगळुरुला अनिवार्य होतं. यावेळी बंगळुरुच्या चाहत्याने आपल्या संघाचा कर्णधार विराट कोहलीला फलंदाजीदरम्यान मैदानात येत मिठी मारली.

चाहत्याने प्रेमाने मारलेल्या या मिठीचा बंगळुरुला चांगलाच फायदा झाला. विराट कोहली आणि एबी डिव्हीलियर्सने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बंगळरुने पहिला विजय मिळवला. यावेळी या चाहत्याला पकडण्यासाठी मैदानातील सुरक्षारक्षकांनी मैदानात धाव घेतली. मात्र विराट कोहलीनेही सुरक्षारक्षकांना त्याला आरामात घेऊन जा असं सांगत, प्रसंग सांभाळून घेतला.

याआधी चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची भेट घेण्यासाठीही चाहत्याने अशाच प्रकारे सुरक्षाकडं मोडलं होतं. बंगळुरुसमोर पुढचं आव्हान मुंबई इंडियन्सशी होणार आहे.

अवश्य वाचा – वानखेडे मैदानाला कोणताही धोका नाही, मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण