आयपीएलमध्ये काही वाद उद्भवणारे किस्से समोर आलेले आपण पाहिले आहेत. यंदाच्या हंगामातही कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा सामना वादातीत राहिला. दिल्लीचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन आणि कोलकाताचा कर्णधार ईऑन मॉर्गन यांच्यातील मैदानातील खडाजंगी आपण पाहिली. अनेकांनी या वादाला अश्विन कारणीभूत असल्याचे मत दिले. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी अश्विनला भारताचा खलनायक ही उपमा देत खेळभावनेला तडा गेल्याचे सांगितले. तर त्याच देशाचा दिग्गज माजी फिरकीपटू शेन वॉर्नने म़ॉर्गनला पाठिंबा देत या प्रकरणाला बदनामीकारक म्हटले. आता अश्विनने या प्रकरणावर एकापाठोपाठ एक असे सहा ट्वीट करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. अश्विनने आपल्या ट्वीटमध्ये तीन प्रश्न उपस्थित केले. ऋषभ पंतला चेंडू लागल्याचे पाहिले असते, तर मी धावलो असतो का? मॉर्गनने सांगितल्याप्रमाणे मी बदनाम आहे का? आणि मी भांडलो का? हे प्रश्न अश्विनने यात उपस्थित केले. उत्तरात अश्विन म्हणाला, ''क्षेत्ररक्षकाचा थ्रो पाहून मी धावलो आणि त्याची मला परवानगी आहे. मी मॉर्गनने म्हटल्याप्रमाणे बदनाम नाही आणि मी भांडलो नाही, तर मी स्वत: साठी उभा राहिलो आणि हेच माझ्या शिक्षकांनी आणि पालकांनी मला करायला शिकवले. मॉर्गन किंवा साऊदीच्या क्रिकेटच्या जगात त्यांना जे योग्य किंवा अयोग्य वाटते त्यावर टिकून राहू शकतात परंतु त्यांना मैदानावर नैतिकता सांगण्याचा किंवा अपमानास्पद शब्द वापरण्याचा अधिकार नाही.'' हेही वाचा - पुजारा आणि रहाणेनं केली होती विराटची तक्रार?;आता बीसीसीआयनंच सांगितलं ‘सत्य’! अश्विन पुढे म्हणाला, "याहूनही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे लोक यावर चर्चा करत आहेत आणि इथे चांगली आणि वाईट व्यक्ती कोण आहे याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करीत आहेत! जर तुम्ही धाव नाकारली किंवा नॉन स्ट्रायकरला इशारा दिला तर तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून संबोधले जाईल, असे सांगून त्यांना गोंधळात टाकू नका, कारण हे सर्व लोक जे तुम्हाला चांगले किंवा वाईट म्हणत आहेत त्यांनी आधीच उपजीविका केली आहे.'' ''मैदानावर खेळताना त्या सामन्याला आपला आत्मा द्या आणि खेळाच्या नियमांमध्ये खेळा. सामना संपल्यावर एकमेकांशी हस्तांदोलन करा. हाच एकमेव ‘खेळाचा आत्मा’ मला समजला आहे'', असे अश्विनने आपल्या शेवटच्या ट्वीटमध्ये म्हटले. नक्की काय घडले? दिल्ली कॅपिटल्सच्या डावाच्या १९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर केकेआरचा खेळाडू राहुल त्रिपाठीने थ्रो फेकला. त्याने फेकलेला चेंडू पंतला लागून दूर गेला. त्यानंतर अश्विन-पंत अतिरिक्त धाव घेत धावले. केकेआरचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या म्हणण्यानुसार मॉर्गन या गोष्टीचे समर्थन करत नाही. त्यानंतर साऊदीने त्याला बाद केले. अश्विन पॅव्हेलियनच्या दिशेने जाऊ लागला, तेव्हा केकेआरचा कर्णधार इऑन मॉर्गन काहीतरी बोलला, त्यानंतर अश्विन रागाने मॉर्गनच्या दिशेने जाऊ लागला. या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. नंतर कार्तिकने हस्तक्षेप केल्यानंतर वाद मिटला.