आयपीएल २०२१ स्पर्धेत रंगलेल्या चेन्नई आणि राजस्थान या सामन्यात ऋतुराज गायकवाडची बॅट चांगलीच तळपली. ऋतुराजने ६० चेंडूत १०१ धावा केल्या. या खेलीत ९ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे शतकासाठी ५ धावांची आवश्यकता असताना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने आपलं शतक साजरं केलं. या शतकासह आयपीएलमध्ये ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत ऋतुराजच्या एकूण ५०८ धावा झाल्या आहेत. त्याने पंजाबच्या केएल राहुलला मागे टाकत ऑरेंज कॅप मिळवली आहे. के एल राहुलच्या एकूण ४८९ धावा आहेत. फाफ डुप्लेसीच्या ४६०, तर शिखर धवनच्या ४५४ धावा आहेत. ऋतुराजने या सामन्यात पहिल्या ३१ धावा या ३० चेंडूत केल्या. त्यानंतर ४० चेंडूत त्याने ७० धावा केल्या. चेन्नईनं सामन्याची सुरुवात दमदार केली. पहिल्या गड्यासाठी ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसिसने ४७ धावांची भागीदारी केली. मात्र २५ वैयक्तिक धावसंख्येवर असताना फाफन राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर स्टम्पिंग झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला सुरेश रैनाही मैदानात जास्त वेळ तग धरू शकला नाही. ३ धावा करून राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या गड्यासाठी ऋतुराज आणि मोइन अलीने चांगली भागीदारी केली. संघाच्या ११४ धावा असताना मोइन अली बाद झाला. राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर संजू सॅमसननं त्याला स्टम्पिंग केलं. त्यानंतर अंबाती रायडू मैदानावर जास्त वेळ तग धरू शकला नाही. रायडू चेतन साकारियाच्या गोलंदाजीवर २ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाडने अर्धशतकी भागीदारी केली. शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत ऋतुराजनं आपलं शतक साजरं केलं. त्याने ६० चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १०१ धावा केल्या.