आयपीएल २०२१ स्पर्धेत दिल्लीला नमवत कोलकाताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे दिल्लीचं आयपीएल जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. दिल्लीनं ५ गडी गमवत १३५ धावा केल्या आणि विजयासाठी १३६ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान कोलकाताने ३ गडी आणि १ चेंडू राखून पूर्ण केलं. दोन चेंडूत ६ धावांची गरज असताना राहुल त्रिपााठीने आर. अश्विनच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला आणि संघाला विजय मिळवून दिला. यानंतर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी आर. अश्विनवर टीकास्त्र सोडलं आहे. माझ्या संघात अश्विनसारखा खेळाडू नकोच, अशी प्रतिक्रिया संजय मांजरेकर यांनी दिली आहे. त्याच्याऐवजी वरूण चक्रवर्ती आणि सुनील नरिनला संधी देईल असंही त्यांनी पुढे सांगितलं. "आपण अश्विनबद्दल खुपच जास्त चर्चा करत आहोत. टी २० स्पर्धेसाठी अश्विन योग्य गोलंदाज नाही. तुम्हाला वाटतं अश्विनच्या गोलंदाजीत फरक पडला पाहीजे. पण मला तसं वाटत नाही. कारण गेल्या पाच सात वर्षात त्याच्या गोलंदाजीत कोणताच फरक पडलेला नाही. कसोटीसाठी तो उत्तम गोलंदाज आहे. मात्र टी २० साठी त्याची गोलंदाजी चालणार नाही. मला जर टर्निंग खेळपट्टी मिळाली, तर मी अश्विनला संघात कधीच घेणार नाही. मी वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरिनला संघात स्थान देईल. टी २० साठी अश्विन विकेट टेकिंग पर्याय नाही. मला वाटत नाही कोणतीही फ्रेंचाइसी त्याला आपल्या संघात फक्त धावगती कमी करण्यासाठी घेईल", असं संजय मांजरेकर यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना सांगितलं. शारजाहच्या संथ खेळपट्टीवर रंगलेल्या या रंगतदार सामन्यात कोलकाताचा कप्तान ईऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टीचा परिणाम आणि कोलकाताच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीला २० षटकात ५ बाद १३५ धावा करता आल्या. प्रत्त्युत्तरात सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल यांनी दमदार सलामी दिली. पण मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशादायक कामगिरी करत थोडी धाकधूक वाढवली. २ चेंडूत ६ धावांची गरज असताना भरवशाचा फलंदाज राहुल त्रिपाठीने षटकार ठोकत कोलकाताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. आयपीएल २०२१चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात १५ ऑक्टोबरला रंगणार आहे.