Arun Jaitley Stadium Received Bomb Threat: भारताची राजधानी दिल्लीत असलेल्या अरूण जेटली स्टेडियमला उडवून टाकू असा धमकी देणारा ई – मेल दिल्ली क्रिकेट असोसिएशनला आला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. डीडीसीएच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी एका अज्ञात ई-मेल आयडीवरून अरूण जेटली स्टेडियमला बॉम्बने उडवू अशी धमकी देणारा मेल आला आहे. याबाबत पोलिसात तक्रार केली असून, पोलिसांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे.
पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्तुत्यर दिलं आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. आता ऑपरेशन सिंदूरचा बदला म्हणून हा मेल आला असल्याचं म्हटलं जात आहे.या मेलमध्ये असे लिहिले आहे की, ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर दिलं जाईल. पाकिस्तानशी संबधित असलेले स्लीपर सेल संपूर्ण भारतात आहेत.
डीडीसीएचे अधिकारी काय म्हणाले?
डीडीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हे वृत्त खरं असल्याचं सांगितलं आहे. धमकीचा ई मेल येताच, डीडीआयच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांत धाव घेतली. याबाबात माहिती देताना ते म्हणाले, ” होय, आज सकाळी ( शुक्रवारी) आम्हाला स्टेडियम उडवून टाकू अशी धमकी देणारा ई मेल आला आहे. तो मेल आम्ही दिल्ली पोलिसांना पाठवला आहे. त्यांनी स्टेडियमची पाहणी केली असून कारवाईला सुरूवात केली आहे.”
अरूण जेटली स्टेडियम हे दिल्ली कॅपिटल्स संघाचं होम ग्राऊंड आहे. या स्टेडियमवर ११ मे रोजी गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार होता. मात्र, बीसीसीआयने स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित
भारत- पाकिस्तान तणावाचा परिणाम आयपीएल २०२५ स्पर्धेवर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गुरूवारी धरमशालेतील मैदानावर पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सामना रंगला. या सामन्यातील पहिल्या डावातील १० षटकं पूर्ण झाली. त्यानंतर हा सामना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. तणावाची स्थिती लक्षात घेऊन, स्टेडियमधील लाईट्स बंद करण्यात आले. त्यानंतर प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज बीसीसीआयने तातडीने बैठक घेऊन ही स्पर्धा एक आठवड्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती दिली.