आयपीएल २०२२ च्या ६४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा १७ धावांनी पराभव केला. या विजयासह ऋषभ पंतच्या संघाने गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे. आयपीएल २०२२ मध्ये दिल्लीने पहिल्यांदाच दोन सामने जिंकले आहेत, तर या पराभवानंतर पंजाबसाठी प्लेऑफची शर्यत आणखी कठीण झाली आहे. पंजाबकडे आता एक सामना शिल्लक आहे, जर संघाला तो जिंकता आला तर ते केवळ १४ गुणांपर्यंत पोहोचता येणार आहे.

पंजाब किंग्जने आपल्या संघात स्टार खेळाडू असल्याचा दावा केला आहे. पण सोमवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पराभवानंतर पंजाबचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होण्याच्या मार्गावर आहे. अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे संघाची कामगिरी त्या दर्जाची झाली नाही. संघाच्या खराब कामगिरीमागे संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे हे एक कारण असल्याचे अनेकांचे मत आहे. जेव्हा खेळाडू चांगली कामगिरी करत नाहीत तेव्हा संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक यांना उत्तर द्यावे लागते, तर संघाने चांगली कामगिरी केल्यावर त्यांना सर्वाधिक दादही मिळते. पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अग्रवालला हा मोसम खूपच खराब गेला आहे. पण प्रशिक्षक कुंबळेही टीकेपासून दूर नाहीत.

दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर, जिथे संघाच्या फलंदाजीवर टीका होत आहे, तिथे चाहते सोशल मीडियावर कुंबळेची खिल्ली उडवायला मागे हटलेल नाहीत. पंजाबच्या खराब कामगिरीबद्दल चाहते कुंबळेवर टीका करत आहेत आणि त्यांना संघातून बाहेर काढण्याची मागणी करत आहेत. एका यूजरने ट्विटरवर लिहिले की, ‘कुंबळेना हटवा, संघ वाचवा.’ त्याचवेळी दुसऱ्या युजरने म्हटले की, पंजाब किंग्सने आधी अनिल कुंबळेला हटवावे. आणखी एका यूजरने म्हटले की कुंबळे सर कृपया राजीनामा द्या किंवा ही फ्रेंचायझी सोडा… तुम्हाला असे पाहू शकत नाही.

मयंक अग्रवालने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. डावाच्या पहिल्याच चेंडूवर लियाम लिव्हिंगस्टोनने डेव्हिड वॉर्नरला गोल्डन डकवर बाद करून दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का दिला. यानंतर सरफराज १६ चेंडूत ३२ धावा करून बाद झाला. सरफराजनंतर ललित यादवने २४ धावा करत मिचेल मार्शला काही काळ साथ दिली, पण तो बाद झाल्यानंतर संघ पत्त्यासारखा कोसळला. ऋषभ पंत आणि पॉवेल यांनी आपापल्या विकेट्स फेकून दिल्या. मार्शने २८ चेंडूत ६३ धावांची शानदार खेळी खेळली. दिल्लीने २० षटकांत ७ गडी गमावून १५९ धावा केल्या.

१६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पंजाब किंग्जला जॉनी बेअरस्टो आणि शिखर धवन यांनी चांगली सुरुवात करून दिली. पंजाबला पहिला धक्का बेअरस्टो (२८) च्या रूपाने ३८ धावांवर बसला. बेअरस्टो बाद झाल्यानंतर पंजाबचा धावगती नियंत्रणात आला आणि पुढील ४४ धावांत संघाने ६ विकेट गमावल्या. जितेश शर्माने ३४ चेंडूत ४४ धावांची खेळी करून सामना नक्कीच रोमांचित करायचा प्रयत्न केला, पण तो शार्दुल ठाकूरसमोर टिकू शकला नाही. या सामन्यात शार्दुलने ४ विकेट घेतल्या आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पंजाबला २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १४२ धावा करता आल्या.