मुंबई : यंदाच्या ‘आयपीएल’मधील दमदार कामगिरीमुळे यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकच्या भारतीय संघातील पुनरागमनाची शक्यता बळावली आहे, असे मत त्याचा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघातील सहकारी विराट कोहलीने व्यक्त केले. कार्तिकने बंगळूरुसाठी आतापर्यंत सहा सामन्यांमध्ये १९७ धावा फटकावल्या आहे. ‘‘यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये कार्तिकने उत्कृष्ट कामगिरी केली असून तो पुढेही असाच खेळ करत राहील याची मला खात्री आहे.  कार्तिकचे ध्येय (भारतीय संघात स्थान) ठरलेले असून ते गाठण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बंगळूरुच्या यशात त्याचे महत्त्वाचे योगदान आहेच, शिवाय सर्वोच्च स्तरावरील (भारतीय संघाशी निगडित) व्यक्तींनाही त्याच्या या दमदार कामगिरीची दखल घ्यावी लागेल,’’ असे कोहली म्हणाला.