BCCI Big Message To Overseas Players: भारत- पाकिस्तान या दोन्ही देशातील वाढता तणाव पाहता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवडड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरूवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सामना होणार होता. मात्र, हा सामना सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. धरमशालेतील हा सामना रद्द झाल्यानंतर, खेळाडूंना स्पेशल वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमधून दिल्लीत आणण्यात आलं. आता परदेशी खेळाडूंनी मायदेशी जाण्याची वाट धरली असल्याचं म्हटलं जात आहे.

आयपीएल स्पर्धा पूर्णपणे स्थगित करण्यात आलेली नाही . भारत – पाकिस्तानातील तणावाची स्थिती पाहता ही स्पर्धा केवळ १ आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होऊ शकते. खेळाडूंना सुरक्षित जागी पोहोचवण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. माध्यमातील वृत्तानुसार, काही संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य मायदेशी परतले आहेत. त्यामुळे आयपीएल पुन्हा एकदा सुरू झाली, तर हे खेळाडू परत येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, बीसीसीआयने फ्रँचायझींना आधीच कल्पना दिली आहे की, खेळाडूंना एक आठवड्यानंतर आयपीएल खेळण्यासाठी तयार ठेवावं. यावरून हे तर स्पष्ट होत आहे की, बीसीसीआयने परदेशी गेलेल्या खेळाडूंना एका आठवड्यात भारतात यावं लागेल अशा सुचना दिल्या आहेत. मात्र, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

ज्यावेळी पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना रद्द करण्यात आला, त्यावेळी असं म्हटलं गेलं होतं की, ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर बीसीसीआयने आपल्या प्रेस रिलीझमध्ये सांगितले की, ही स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. मात्र, स्पर्धा पुन्हा केव्हा सुरू होणार? स्पर्धा कुठे होणार? याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

ईसीबीने दिली ऑफर

आयपीएल स्पर्धेत एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी ५८ सामने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे अजूनही १६ सामने शिल्लक आहेत. हे सामने कुठे होणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. माध्यमातील वृ्त्तानुसार, इंग्लंड क्रिकेट बोर्डने बीसीसीआयला उर्वरीत सामने इंग्लंडमध्ये खेळवण्याची ऑफर दिली आहे. आता बीसीसीआय काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.