IPL 2025 How Mumbai Indians Seals Top-2 in Points Table: सूर्यकुमार यादव-तिलक वर्मा आणि नमन धीर यांची फलंदाजी आणि नंतर बुमराह-सँटनर यांच्या गोलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने शानदार विजय मिळवला. २१ मे रोजी वानखेडेच्या मैदानावर झालेल्या दिल्लीविरूद्धच्या सामन्यात मुंबईने ५९ धावांनी विजय मिळवत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. यापूर्वीच ३ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले होते. पण आता चौथ्या स्थानी असलेला मुंबई इंडियन्सचा संघ टॉप-२ मध्ये कसा पोहोचू शकतो जाणून घेऊया.
गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे ४ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. आता टॉप-२ स्थानासाठी गुजरात, बेंगळुरू पंजाब, मुंबई यांच्यात मोठी चुरस असणार आहे. त्यामुळे कोणता संघ टॉप-२ मध्ये जाणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.
गुजरात टायटन्सचा संघ जास्तीत जास्त २२ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. गुजराचे २२ मे रोजी लखनौ विरुद्ध आणि २५ मे रोजी चेन्नई विरुद्ध असे दोन सामने आहेत. तर जास्तीत जास्त २१ गुणांपर्यंत पोहोचू शकणाऱ्या बेंगळुरूचेही २ सामने सामने शिल्लक आहेत. बंगळुरूचा पुढील सामना २३ मे रोजी हैदराबादविरुद्ध आणि २७ मे रोजी लखनौविरुद्ध होईल. तर पंजाब किंग्जचा सामना २४ मे रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि २६ मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. तर मुंबईचा एक सामना बाकी असून संघ जास्तीत १८ गुणांपर्यंत पोहोचू शकतो.
मुंबई इंडियन्सचा संघ टॉप-२ मध्ये कसा पोहोचणार?
१. मुंबईला सर्वात आधी पंजाब किंग्सविरूद्धचा अखेरचा सामना काही करून जिंकावं लागेल, जेणेकरून संघाचे १८ गुण होतील. पण हा विजय पुरेसे असणार नाही.
२. दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव केला पाहिजे अशी प्रार्थना करावी लागेल. तर हैदराबाद आणि लखनौने त्यांच्या शेवटच्या सामन्यात बंगळुरूला हरवल्यास मुंबईला त्याची मदत होईलं. जर असं झालं तर बंगळुरू आणि पंजाबचे गुण १७-१७ पर्यंत मर्यादित राहतील.
३. २ संघांचे गुण १७-१७ गुणांपर्यंत मर्यादित राहिल्यास १८ गुणांसह मुंबईचा संघ टॉप-२ मध्ये जाऊ शकतो. शिवाय मुंबईचा नेट रन रेटही उत्तम आहे. पण आरसीबी आणि पंजाबची कामगिरी पाहता प्रतिस्पर्धी संघांना त्यांना पराभूत करणं सोपं नसणार आहे.
४. गुणतालिकेतील टॉप-३ संघांनी आपले उर्वरित दोन्ही सामने गमावले तर मुंबईचा संघ पहिल्या स्थानी जाऊ शकतो.
५. जर टॉप-३ संघांपैकी दोन संघांनी त्यांच्या उर्वरित सामन्यातील १-१ सामना जरी जिंकला तरी मुंबईला टॉप-२ गाठणं कठीण होईल.

आयपीएल प्लेऑफमध्ये टॉप-२ गाठणं का महत्त्वाचं असत?
आयपीएल गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानांवर असलेले संघ थेट क्वालिफायर सामने खेळतात, त्यामुळे त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दोन संधी मिळतात. पहिल्या दोन स्थानी असलेले संघ पहिला क्वालिफायर सामना खेळतात. तर तिसऱ्या चौथ्या स्थानी असलेले संघ एलिमिनेटर सामना खेळतात. क्वालिफायर १ मधील विजेता थेट अंतिम फेरीत पोहोचतो. तर क्वालिफायरचा १ चा पराभूत संघ क्वालिफायर २ मध्ये खेळू शकतो. त्यामुळे प्लेऑफमध्ये संघ पहिल्या दोन स्थानी पोहोचण्याचा प्रयत्न करतात.