चेन्नई सुपर किंग्जला चार वेळा जेतेपद मिळवून देणारा कॅप्टन माही अर्थात महेंद्रसिंह धोनीने अचानकपणे चेन्नईचे कर्णधारपद सोडले. धोनीने चेन्नई संघाचे कर्णधारपद रविंद्र जाडेजाकडे सोपवले असून अवघ्या दोन दिवसांवर सामना आलेला असताना त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दरम्यान आयपीएलच्या पंधराव्या हंगामानंतर धोनी निवृत्ती जाहीर करेल, असा दावा अनेकांकडून केला जातोय. मात्र चेन्नई सुपर किंग्ज फ्रेंचायजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी धोनीच्या संन्यासाबाबत मोठं विधान केलंय. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून खेळणार असून त्याच्याकडे कर्णधारपद नसेल. कर्णदारपदाचा अचानकपणे त्याग केल्यामुळे आता आयपीएलचा हा हंगाम धोनीचा शेवटचा हंगाम असेल असे अनेकजण म्हणत आहेत. मात्र धोनीने याबाबत अजूनतरी कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. धोनीच्या सन्यासावर चेन्नई सुपर किंग्जचं मोठं वक्तव्य धोनीचा संन्यास तसेच त्याने केलेला कर्णधारपदाचा त्याग याविषयी चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्ननाथ यांनी प्रतिक्रिया दिलीय. धोनीने घेतलेल्या निर्णयावर माझा विश्वास आहे. धोनी मार्गदर्शक म्हणून संघासोबत कायम असेल, असं विश्वनाथ यांनी म्हटलंय. तसेच आयपीएल २०२२ हा हंगाम धोनीचा शेवटचा हंगाम असेल का ? या प्रश्नाचे उत्तर देताना "धोनीचा हा शेवटचा हंगाम नसेल, असं मला वाटतं," अशी प्रतिक्रिया दिली. तसेच "धोनीचा हा शेवटचा हंगाम असेल, असं मला वाटत नाही. धोनी जोपर्यंत तंदुरुस्त आहे, तोपर्यंत तो पुढे जात राहील. मात्र धोनी काय विचार करतो, याबाबत मला माहिती नाही. आम्ही धोनीच्या निर्णयाचा नेहमीच आदर केलेला आहे. तो आमच्यासाठी शक्तीस्तंभ असून त्याचे हे स्थान कायम राहील," असेदेखील विश्वनाथन म्हणाले. दरम्यान, धोनीच्या क्रिकेट संन्यासाबाबत अजूतरी कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. तसेच धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असेल का ? हा प्रश्नदेखील अनुत्तरीतच आहे. येत्या २६ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज तसेच कोलकाता नाईट कायडर्स यांच्यात आयपीएल २०२२ ची पहिली लढत होणार आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात कोण सरस ठरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.