आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २१ वा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन तगड्या संघांमध्ये खेळवला गेला. या हंगामात आतापर्यंत एकही सामना न गमावलेला गुजरात संघ अगोदर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. गुजरातने हैदराबादसमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान, पाचव्या विकेटसाठी फलंदाजीसाठी आलेल्या अभिनव मनोहरच्या फलंदाजीची चांगलीच चर्चा होत आहे. फंदाजीदरम्यान त्याला तब्बल तीन वेळा जिवदान मिळाले असून हैदराबादच्या खेळाडूंनी सोपे झेल सोडले आहेत. चौथ्या प्रयत्नात मात्र मनोहरला बाद करण्यात हैदराबादला यश आले. मनोहरने २१ चेंडूंमध्ये ३५ धावा केल्या.

हेही वाचा >>> सामन्याची नव्हे तर ‘या’ सुंदरीची होती चर्चा, दिल्ली आणि कोलकाता मॅचमधील मिस्ट्री गर्लचं नाव आलं समोर

हैदराबदच्या खेळाडूंनी तीन वेळा झेल सोडले

डेव्हिड मिलर बाद झाल्यानंतर पाचव्या विकेटसाठी अभिनव मनोहर मैदानात उतरला. गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्यानंतर त्यानेच चांगली फलंदाजी केली. त्याने २१ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एक षटकार यांच्या मदतीने ३५ धावा केल्या. मात्र या धावा करताना त्याला आश्चर्यकारित्या तब्बल तीन वेळा जीवदान मिळाले. फक्त दहा चेंडूंमध्ये हैदराबादच्या ऐडन मर्कराम, राहुल त्रिपाठी आणि भुवनेश्वर कुमार यांनी अभिनव मनोहरचा झेल सोडला. मात्र चौथ्या वेळी मात्र त्याचा झेल टिपल्यामुळे त्याला तंबुत परतावं लागलं. तीन वेळा जीवदान मिळाल्यामुळे त्याने मोठे फटकेबाजी करत गुजरातसाठी ३५ धावा केल्या.

हेही वाचा >>> विश्लेषण : रिटायर्ड आऊट म्हणजे नक्की काय रे भाऊ, नियम काय सांगतो ? जाणून घ्या सविस्तर

दरम्यान, तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या हार्दिक पांड्याने जबाबदारीने अर्धशतकी खेळी केली. त्याने ४२ चेंडूंमध्ये चार चौकार आणि एक षटकार यांच्या मदतीने नाबाद ५० धावा केल्या. त्याच्या या खेळाच्या जोरावर गुजरातला १६२ धावांपर्यंत मजल मारता आली. तर सलामीला आलेली डेविड वेड, शुभमन गिल ही जोडी चांगली कामगिरी करु शकली नाही. वेडने १९ तर शुभमन गिलने फक्त ७ धावा केल्या.