आयपीएल २०२२ चा ६५ वा सामना मंगळवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. हैदराबादने हा सामना ३ धावांनी जिंकून प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून १९३ धावा केल्या. मुंबईला विजयासाठी १९४ धावांचे लक्ष्य होते, परंतु संघाला २० षटकांत ७ गडी गमावून १९० धावा करता आल्या आणि सामना ३ धावांनी गमवावा लागला. सामन्यादरम्यान असे अनेक टर्निंग पॉईंट्स आले, ज्यामध्ये असे वाटत होते की दोनपैकी एक संघ येथून जिंकू शकेल, परंतु नशिबाने शेवटी सनरायझर्स हैदराबादची साथ दिली.

आयपीएल २०२२ चा सर्वात महागडा खेळाडू इशान किशन अपेक्षेप्रमाणे खेळ करु शकला नाही. पण मुंबई इंडियन्सचा हा यष्टिरक्षक फलंदाज त्याच्या फॉर्मबद्दल चिंतित नाही आणि सर्वोत्तम खेळाडूंना देखील वाईट गोष्टींना सामोरे जावे लागले आहे, असे म्हणत आहे. ईशानला मुंबई इंडियन्सने १५ कोटी २५ लाख रुपयांना खरेदी केले होते, मात्र तो १३ सामन्यांत ३०.८३ च्या सरासरीने केवळ ३७० धावा करू शकला आहे.

IPL 2022 : कोट्यवधी रुपये मिळाल्यावर प्राईज टॅगमुळे उडाली ईशान किशनची झोप; विराट, रोहितने दिला सल्ला

सलग आठ पराभवानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. मंगळवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध तीन धावांनी पराभव झाल्यानंतर ईशान म्हणाला, “सर्वोत्तम खेळाडूंनाही संघर्ष करावा लागला आहे. ख्रिस गेललाही कधी-कधी सेट व्हायला वेळ लागतो हे मी पाहिले आहे.”

“प्रत्येक दिवस नवीन असतो आणि प्रत्येक सामना नवीन असतो. कधी चांगली सुरुवात होते तर कधी विरोधी गोलंदाज तयारीनिशी उतरतात. ड्रेसिंग रुममधील रणनीती बाहेरील लोकांना काय हवे असते यापेक्षा वेगळी असते. क्रिकेटमध्ये हे कधीच निश्चित नसते की तुमची एकच भूमिका असते आणि तुम्ही मैदानावर उतरताच चेंडू मारायला सुरुवात कराल. जर तुम्ही संघाचा विचार करत असाल तर तुमची भूमिका स्पष्ट असणे गरजेचे आहे,” असे इशान किशान म्हणाला.