भारतीय संघाचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहलने आयपीएल २०२२ मधील पहिली हॅट्ट्रिक मिळवली आहे. राजस्थान रॉयल्सच्या खेळणाऱ्या फिरकीपटूने चहलने सोमवारी रात्री मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध हॅट्ट्रिक पूर्ण केली. चहलची आयपीएलमधली ही पहिली हॅटट्रिक आहे आणि या मोसमातील कोणत्याही गोलंदाजाचीही पहिलीच हॅटट्रिक आहे. चहलने १७व्या षटकात हॅट्ट्रिकसह चार विकेट घेतल्या. या षटकात त्याने कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर, शिवम मावी आणि पॅट कमिन्स यांना आपले बळी बनवले.

चहलने खास नियोजन करून या सामन्यात उतरला होता. सामन्यानंतर त्याने याचा खुलासा केला आहे. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याची त्याची योजना होती आणि त्यासाठी त्याने सामन्याच्या एक दिवस आधी प्रशिक्षक आणि कर्णधारासोबत खास योजना आखली होती, असे चहलने सांगितले.

‘मला माहित होतं की त्या षटकात मला विकेट घ्यायची आहेत. त्यामुळे मी चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याची योजना आखली. याबाबत कालच माझी प्रशिक्षक आणि कर्णधाराशी चर्चा झाली. हॅटट्रिक चेंडूवर गुगलीची वाट पाहिली जात होती हे मला माहीत होते. याआधी मला गुगली चेंडूवर षटकार मारला गेला होता आणि मला धोका पत्करायचा नव्हता. मला फक्त डॉट बॉल टाकायचा होता. क्रिकेटमध्ये असे घडते. गुगली चांगली होती आणि त्यामुळे अय्यरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, असे चहलने म्हटले.

आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेणारा चहल या मोसमातील पहिला आणि आतापर्यंतचा २१वा आणि राजस्थान रॉयल्सचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी अजित चंडिला, प्रवीण तांबे, शेन वॉटसन आणि श्रेयस गोपाल यांनी आयपीएलमध्ये राजस्थान संघासाठी हॅटट्रिक घेतली आहे. चहल व्यतिरिक्त लक्ष्मीपती बालाजी, अमित मिश्रा, युवराज सिंग, रोहित शर्मा, प्रवीण कुमार, अझील चंडेला, प्रवीण तांबे, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट, श्रेयस गोपाल आणि हर्षल पटेल हे एकमेव भारतीय गोलंदाज आहेत ज्यांनी आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेतली आहे. मिश्रा यांनी ही कामगिरी सर्वाधिक तीन वेळा केली आहे.

दरम्यान, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाइट रायडर्सचा सात धावांनी पराभव केला. फिरकीपटू युझवेंद्र चहलने राजस्थानच्या विजयात मोसमातील पहिली हॅटट्रिक घेतली आणि कारकिर्दीतील पहिले पाच बळी घेतले. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरच्या १०३ धावांच्या जोरावर २१७ धावा केल्या. यापुढे केकेआरचा डाव २१० धावांवर गारद झाला. कोलकाताकडून कर्णधार श्रेयस अय्यरने ८५ धावांची खेळी खेळली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. राजस्थानकडून युझवेंद्र चहलने चार षटकात ४० धावा देत पाच बळी घेतले.