आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ३३ वा सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नेहमीप्रमाणे फिनिशरची भूमिका बजावली. धोनीने शेवटच्या षटकात चौकार आणि षटकार लगावत विजय खेचून आणला. या सामन्यात मुंबईचा पराभव झाला असून चेन्नईने तीन गडी राखून सामना खिशात घातला. आजच्या पराभावनंतर मुंबई इंडियन्स प्लेऑपपर्यंत पोहोचू शकणार नसल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा >>> अरेरे… मुंबई इंडियन्सला झालंय तरी काय? पहिल्याच षटकात सलामीचे दोन्ही फलंदाज शून्यावर बाद!

मुंबईने दिलेल्या १५६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरताच चेन्नई संघाला पहिल्याच चेंडूवर मोठा फटका बसला. सलामीला आलेला ऋतुराज गायकवाड शून्यावर झेलबाद झाला. त्यानंतर चेन्नईचे खेळाडू ठराविक अंतरावर बाद होत गेले. सलामीला आलेल्या उथप्पाने ३० धावा केल्या. तर मिचेल सँनटरने ११ धावा करुन संघाला लक्ष्यापर्यंत जाण्यास मदत केली.

हेही वाचा >>> IPL 2022 : गोलंदाजांचं चोख काम , पण आजी-माजी कर्णधारांनीच केल्या चुका, जाडेजा-धोनीमुळे चेन्नईला फटका

मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांना शेवटपर्यंत रोखून धरले. मधल्या फळतील अंबाती रायडूने चांगली खेळी करत चेन्नईसाठी ४० धावा केल्या. तर शिवम दुबे (१३), रविंद्र जाडेजा (३) स्वस्तात बाद झाले. शेवटी मात्र महेंद्रसिंग धोनी आणि ड्वेन प्रिटोरिअस या जोडीने चेन्नईला विजयापर्यंत नेलं. धोनीने शेवटच्या षटकात १७ धावांची गरज असताना षटकार आणि दोन चौकार लगावत विजय खेचून आणला. तर प्रिटोरिअसने २२ धावा करत चेन्नईच्या पडत्या काळात धोनीला साथ दिली. शेवटी महेंद्रसिंग धोनीने फिनिशरची भूमिका पार पडत चेन्नईला विजय मिळवून दिला.

हेही वाचा >>> विश्लेषण: आयपीएलमध्ये करोना नियम काय आहेत? किती खेळाडूंसोबत संघ मैदानात उतरु शकतो?

याआधी नाणेफेक जिंकून चेन्नईने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबई संघ सुरुवातीला फलंदाजीसाठी आला. मात्र मुंबईची सुरुवात अतिशय खराब झाली. मुंबईचे दोन्ही सलामीवीर पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाले. रोहित शर्मा मुकेश चौधरीने टाकलेल्या चेंडूचा सामना करताना झेलबाद झाला. तर तिलक वर्मा त्रिफळाचित झाला. पहिल्याच षटकात दोन गडी बाद झाल्यानंतर मुंबई संघावरील दवाब वाढला. त्यानंतर संघ २३ धावांवर असताना दुसऱ्या विकेटसाठी आलेला देवाल्ड ब्रेविसदेखील मुकेश चौधरीच्याच चेंडूवर चार धावांवर झेलबाद झाला.

हेही वाचा >>> अर्जुन तेंडुलकरची भन्नाट गोलंदाजी, नेट प्रॅक्टिस करताना केलं क्लीन बोल्ड, पाहा व्हिडीओ

त्यानंतर मधल्या फळीतील खेळाडूंनी मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सूर्यकुमार यादवेने ३२ धावा केल्या. तर चौथ्या विकेटसाठी आलेल्या तिलक वर्माने ५१ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्याने ४३ चेंडूमध्ये ५१ धावा केल्या. तसेच हृतिक शोकीन (२५) आणि किरॉन पोलार्ड (१४) यांनीदेखील संघाला १५५ धावांपर्यंत घेऊन जाण्यास मदत केली. जयदेव उनाडकट यानेदेखील नाबाद १९ धावांची खेळी केली.

हेही वाचा >>> पोलार्डच्या निवृत्तीमुळे सुनील नारायण व्यथित, म्हणाला…

गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर चेन्नईच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना पुरतं बांधून ठेवलं होतं. सुरुवातीला मुकेश चौधरीने तीन विकेट घेत मुंबईचा संघ खिळखिळा केला. तर सँटनर, माहिश तिक्षाणा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. डीजे ब्राव्हो याने दोन फलंदाजांना तंबुत पाठवून चेन्नईसाठी मोठी कामगिरी केली. गोलंदाजांनी आपले काम चोख बजावल्यामुळेच मुंबई संघ अवघ्या १५५ धावा करु शकला.