रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२२ मध्ये पहिला विजय मिळाला आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या रोहमहर्षक सामन्यात मुंबईने पाच विकेट राखून राजस्थानचा पराभव केला आहे. आयपीएलच्या १५ व्या मोसमात सलग आठ सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सला हा विजय मिळाला आहे. बर्थडे बॉय रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरच्या अर्धशतकाच्या जोरावर १५८ धावा केल्या. मुंबईने १५९ धावांचे लक्ष्य १९.२ षटकांत पाच गडी गमावून पूर्ण केले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा दोन तर इशान किशनने २६ धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक झळकावले. सूर्यकुमार यादव ५१ धावा करून बाद झाला. दोन चेंडूंनंतर, तिलक वर्मा ३५ धावा करुन बाद झाला. तर किरॉन पोलार्ड १० धावा करून बाद झाला. टीम डेव्हिड २० आणि सॅम्स सहा धावा करून नाबाद परतले. राजस्थान रॉयल्सचेकडून पडिक्कल (१५) आणि सॅमसन (१६) धावा करून झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर बटलरने मिशेल (१७) सोबत डाव सांभाळला. बटलरने ४८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने हृतिकच्या षटकात सलग चार षटकार मारून आपला स्ट्राईक रेट वाढवला. बटलरने ५२ चेंडूत ६७ धावा केल्या. शेवटी अश्विनने नऊ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २१ धावांची तुफानी खेळी करत संघाला १५० च्या पुढे नेले. मुंबईकडून हृतिक आणि मेरेडिथने प्रत्येकी २ बळी घेतले