आयपीएल २०२२ स्पर्धेत सनराईजर्स हैदराबाद संघ चांगली खेळी करतोय. आतापर्यंत झालेल्या ८ पैकी ५ सामन्यात विजय, तर ३ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. हैदराबादचा संघ १० गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. हैदराबाद संघासोबत तरुण गोलंदाज उमरान मलिकचीही चर्चा रंगली आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या ८ सामन्यात त्याने एकूण १५ गडी बाद केले असून चौथ्या स्थानावर आहे. त्याच्या कामगिरीमुळे त्याचं कौतुक होत आहे. मात्र माजी क्रिकेटपटू मुनाफ पटेल यांना त्याच्या गोलंदाजीबाबत चिंता वाटत आहे. त्यामुले उमरान काळजी घ्या, असं आवाहन मुनाफ पटेलनं बीसीसीआयकडे केलं आहे. मुनाफ पटेल यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "वयाच्या २१ व्या वर्षी उमरानला माझा सल्ला असेल की जा आणि उत्साहाने चेंडू टाका. त्याला गोलंदाजी करण्यासाठी धावताना पाहून मलाही गोलंदाजी करावीशी वाटते. अशा मुलांना आयपीएलमध्ये संधी मिळणे हे खरंच आनंददायी आहे. आमच्या खेळाडूंना जगातील सर्वात मोठ्या लीगचा फायदा होत आहे हे चांगले वाटते. विशेषत: जे खेळाडू छोट्या ठिकाणाहून येतात. नाहीतर तो इथे कसा आणि कुठे खेळत असता कुणास ठाऊक? आता तो लीगमधील सर्वात वेगवान गोलंदाज आहे आणि त्यामुळे मला खूप आनंद होतो." "जहीर खान सुरुवातीला टीम इंडियामध्ये आला तेव्हा तो १४५ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करायचा. मीही त्याच वेगाने गोलंदाजी करायचो. इशांत शर्मा, व्हीआरव्ही सिंगही धारदार होते. सध्या उमेश यादव, नवदीप सैनी यांचा वेगही चांगला आहे. अशा स्थितीत अशी व्यवस्था असायला हवी, ज्याद्वारे वेगवान गोलंदाज एका वर्षात किती सामने खेळणार हे निश्चित केले जाईल. आता अर्थातच फिजिओथेरपी आणि प्रशिक्षणाच्या बाबतीत तंत्रज्ञान प्रगत झाले आहे, पण तरीही उमरानसारख्या गोलंदाजाची काळजी घ्यावी लागेल. जर तुम्ही उमरानचा खूप वापर केला तर त्याला दुखापत होण्याची शक्यता आहे आणि याचा अर्थ त्याला त्याचा वेग सांभाळावा लागेल." असं मुनाफ पटेल यांनी पुढे सांगितलं. उमरानचा इंग्लंड दौऱ्यासाठी विचार व्हावा -गावस्कर "स्टेनप्रमाणे उमरानने लाईन आणि लेन्थवर अधिक लक्ष केंद्रित केले तर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा कोणीही रोखू शकत नाही. बाकी पुन्हा त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. लांब आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी वेगाशी तडजोड करावी लागते. कारण भारतामध्ये तुम्हाला बहुतेक वेळा गोलंदाजी करावी लागते, जेथे वेगवान गोलंदाजीसाठी परिस्थिती अनुकूल नसते. अशा स्थितीत उमरानने १४५ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली तरी लाईन लेन्थ अचूक ठेवावी लागेल आणि चेंडू स्विंग केला तर ते त्याच्यासाठी चांगले होईल." असंही मुनाफ पटेल यांनी पुढे सांगितलं.