पीटीआय, नवी दिल्ली : ‘आयपीएल’चा अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबादला होणार आहे. याचप्रमाणे महिलांची ट्वेन्टी-२० चॅलेंज ही प्रायोगिक तत्त्वावरील स्पर्धा २३ ते २८ मे या कालावधीत पुण्यात होणार आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी घोषित केले. ‘आयपीएल’चे ‘क्वालिफायर’-१ आणि एलिमिनेटर हे दोन सामने अनुक्रमे २४ आणि २५ मे या दिवशी कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडिमयवर होणार आहेत. त्यानंतर ‘क्वालिफायर’-२ व अंतिम सामना अनुक्रमे २७ आणि २९ मे या दिवशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतील.

गेल्या महिन्यात झालेल्या ‘बीसीसीआय’च्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीनंतर अध्यक्ष सौरव गांगुलीने महिलांची ट्वेन्टी-२० चॅलेंज स्पर्धा लखनऊला होणार असल्याचे म्हटले होते. पण या स्पर्धेचे सामने आता पुण्यात २३, २४ व २६ मे या दिवशी होतील, तर अंतिम सामना २८ मे रोजी खेळवण्यात येणार आहे.