IPL 2020 FINAL: बलाढ्य मुंबई इंडियन्सने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने ५ गडी राखून सहज विजय मिळवला. मुंबईचे हे पाचवे IPL विजेतेपद ठरले. मुंबईच्या ऐतिहासिक यशानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे क्रीडापटूंचे अभिनंदन करण्यात नेहमीच अग्रणी असतात. मुंबईच्या विजयानंतर त्यांनीही खास ट्विट करत संघाला शुभेच्छा दिल्या. "अभिनंदन मुंबई इंडियन्स! आम्हाला तुमचा अभिमान आहे!", असे ट्विट करत त्यांनी संघातील सर्वांचे कौतुक केले. अभिनंदन @mipaltan आम्हाला तुमचा अभिमान आहे! — Aaditya Thackeray (@AUThackeray) November 10, 2020 आदित्य ठाकरेंव्यतिरिक्त राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई संघाचे अभिनंदन केले. ".आणि पुन्हा एकदा आमची मुंबई इंडियन्स विजयी झाली. पाचव्यांदा IPLचा चषक उंचावल्याबद्दल संपूर्ण संघाचं मनापासून अभिनंदन! रोहित. तू खरंच एक उत्तम कर्णधार आहेस. आम्हाला तुझा अभिमान वाटतो", असं ट्विट फडणवीस यांनी केलं. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी ९६ धावांची भक्कम भागीदारी केली. ऋषभ पंतने ५६ तर श्रेयस अय्यरने नाबाद ६५ धावांची खेळी केली. १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरूवात केली. रोहित शर्माने सुर्यकुमार यादवच्या साथीने विजयाचा पाया रचला. रोहित धावा काढून बाद झाला. त्यानंतर इशान किशन आणि कृणाल पांड्या जोडीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.