KKR Management Should Move The Franchise Away: यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने गुवाहटीत झालेल्या सामन्यात राजस्थानला पराभूत करत आपले विजयाचे खाते उघडले आहे. तत्पूर्वी पहिल्या सामन्यात कोलकात्याला घरच्या ईडन गार्डन्स मैदानावर रॉयल चॅलेंजर्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यामध्ये मजेशीर गोष्ट अशी की, कोलकात्याला त्यांचे होम ग्राउंड असलेल्या ईडन गार्डन्सवर फिरकीपटूंसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टी तयार करण्यास क्युरेटरने नकार दिला होता. पण परंतु गुवाहाटीत कोलकात्याच्या फिरकीपटूंना अनुकूल परिस्थिती मिळताच त्यांनी त्याचा फायदा उठवला.

क्विंटन डी कॉकच्या नाबाद ९७ धावांमुळे कोलकात्याने राजस्थानवर आठ विकेट्सने विजय मिळवला. पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, त्यांचे फिरकीपटू मोईन अली आणि वरुण चक्रवर्ती यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना त्यांनी फक्त १५१ धावांवर रोखले.

बंगळुरू विरुद्धच्या पहिल्या सामन्यादरम्यान, ईडन गार्डन्सचे पिच क्युरेटर सुजन मुखर्जी यांनी केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असलेली खेळपट्टी बनवण्याची विनंती केली होती. पण रहाणेची ही विनंती नाकारल्याचे वृत्त समोर आले होते. असे इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे.

यावेळी रहाणेच्या विनंतीला उत्तर देताना क्युरेटर सुजन मुखर्जी यांनी, “मी इथे असेपर्यंत” खेळपट्टी बदलणार नाही”, असे म्हटले होते.

केकेआरने कोलकाता सोडावे

दरम्यान या प्रकरणाची माहिती समोर येताच न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सायमन डोल यांनी, कोलकाता नाइट रायडर्सने “फ्रँचायझी दुसरीकडे हलवण्याचा” विचार करावा, असे म्हटले आहे.

ते म्हणाले, “जर क्युरेटर घरच्या संघाला काय हवे आहे याकडे लक्ष देत नसेल तर काय उपयोग. ते स्टेडियमचे शुल्क भरत असतील, आयपीएलमध्ये काय चालले आहे याकडे लक्ष देत असतील पण तरीही क्युरेटर अजूनही घरच्या संघाला काय हवे आहे याची काळजी घेत नसेल, तर कोलकाता नाइट रायडर्सने फ्रँचायझी दुसरीकडे हलवावी. खेळावर मत मांडणे त्यांचे काम नाही. त्यासाठी त्यांना पैसे दिले जात नाहीत,” असे डोल यांनी क्रिकबझवर बोलताना म्हटले.

हर्षा भोगलेंची नाराजी

“जर ते घरच्या मैदानावर खेळत असतील तर त्यांना त्यांच्या गोलंदाजांसाठी योग्य वाटणारी खेळपट्टी मिळायला हवी. कोलकाता नाइट रायडर्सच्या क्युरेटरनी जे म्हटले आहे ते मी पाहिले. जर मी केकेआर कॅम्पमध्ये असतो, तर त्यांनी जे म्हटले त्यावर मी खूप नाराज झालो असतो. पण मला वाटते की आयपीएलसारख्या स्पर्धेत घरच्या मैदानावर फायदा मिळवण्यात काहीही गैर नाही”, अशा शब्दांत हर्षा भोगले यांनीही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे.