आयपीएलच्या १५ व्या हंगामातील २६ वा सामना चांगलाच अटीतटीचा ठरला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने धडाकेबाज खेळी करत मुंबईवर १८ धावांवर विजय मिळवला. या सामन्यात मुंबईचा एकही फलंदाज चांगली खेळी करु शकला नाही. सलामीवीर इशानही स्वस्तात बाद झाला. दरम्यान, या सामन्यात बाद झाल्यानंतर इशान किशनला राग अनावर झालाय. त्याने तंबुत परतत असताना सीमारेषेवर आपला राग काढलाय.

हेही वाचा >> आरसीबीच्या दिनेश कार्तिकचं मोठं स्वप्न, म्हणतो “भारताला टी-२० विश्वचषक…”

मुंबई इंडियन्सने इशान किशनला १५ कोटी २५ लाख रुपयांना खरेदी केलेलं आहे. त्याने या हंगामात काही सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली. दिल्ली कॅपिटल्सविरोधात खेळताना त्याने नाबाद ८१ धावा केल्या होत्या. तसेच राजस्थानविरोधात खेळताना त्याने अर्धशतक झळकावले होते. मात्र त्यानंतर इशान किशन अजूनतरी बहारदार खेळ करुन दाखवू शकलेला नाही. लखनऊ सुपर जायंट्सविरोधात खेळताना तो अवघ्या १३ धावांवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर मैदानावरुन तंबुत परतताना त्याला राग अनावर झाला. त्याने आपली बॅट सीमारेषेवर आदळली. सीमारेषेवर स्पॉन्सर्सची नावं असतात. या नावावरच त्याने बॅट आदळल्यामुळे त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> IPL 2022, RCB vs DC : बंगळुरूची दिल्लीवर १६ धावांनी मात, डीके दादा पुन्हा तळपला !

या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने धमाकेदार खेळ केला. लखनऊचा कर्णधार केएल राहुल याने नाबाद १०३ धावा करत शतक झळकावले. राहुलच्या मदतीने लखनऊने १९९ धावांचा डोंगर उभारला. तर मुंबईच्या सलामीवीरांपासून ते मधल्या फळीपर्यंत एकही फलंदाज चांगली खेळी करु शकला नाही. त्यामुळे मुंबई संघ अवघ्या १८१ धावा करु शकला. मुंबईचा १८ धावांनी पराभव झाला.