आयपीएलचा १५ वा हंगाम अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना कॅप्टन कूल म्हणून ओळख असेलल्या महेंद्रसिंह धोनीने सर्वांनाच धक्का दिला. धोनी चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदापासून बाजूला झालेला असून त्याने सर्व सूत्रए रविंद्र जाडेजाकडे सोपवली आहेत. या हंगामात चेन्नईचं कर्णधारपद रविंद्र जाडेजा भूषवणार असून महेंद्रसिंग धोनी फक्त खेळाडू म्हणून संघात सहभागी असेल. दरम्यान, संघाचे कर्णधारपद आल्यानंतर रविंद्र जाडेजाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. संघाचे कर्णधारपद आल्यानंतर कसं वाटतं असं जाडेजाला विचारण्यात आलं. त्यानंतर संघामध्ये महेंद्रसिंग धोनी असल्यामुळे त्याचा सल्ला मला मिळत राहील, त्यामुळे मला कशाचीही चिंता करण्याची गरज नाही असं रविंद्र जडेजाने आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. "मला अतिशय छान वाटत आहे. महेंद्रसिंह धोनीने अगोदर मोठा वारसा दिलेला आहे. त्यामुळे मला हा वारसा पुढे घेऊन जावं लागणार आहे. मला जास्त चिंता करण्याची गरज नाही. मला जो प्रश्न पडेल, तो मी धोनीला नक्की विचारणार आहे. धोनी अजूनही माझ्यासोबत आहे. तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार," असं रविंद्र जाडेजाने म्हटलंय. दरम्यान, २६ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज हा संघ कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार आहे. त्याआधीच धोनीने कर्णधारपदावरुन पायऊतार होऊन रविंद्र जाडेजाकडे सर्व सूत्रे दिली आहेत. धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत चार वेळा जेतेपद पटकावलेले आहे. हाच वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम रविंद्र जाडेजाला करावे लागेल. विशेष म्हणजे धोनी अजूनही संघात कायम आहे. त्यामुळे जाडेजाला धोनीची मदत मिळणार आहे. धोनीने आतापर्यंत क्रिकेटच्या सर्वच प्रकारांमध्ये संघाचे नेतृत्व केलेले आहे.