चेन्नई सुपर किंग्सचा नवा कर्णधार रवींद्र जडेजाने आयपीएल २०२२ मध्ये सातत्याने खराब कामगिरी केल्यानंतर हंगामाच्या मध्यात कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. त्याने आठ सामन्यांत सहा पराभव पत्करल्यानंतर पुन्हा धोनीकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्जने शनिवारी याची घोषणा केली. जडेजाला आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या प्रेस रिलीझनुसार “रवींद्र जडेजाने आपल्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि एमएस धोनीला चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करण्याची विनंती केली आहे. एमएस धोनीने चेन्नईच्या हितासाठी नेतृत्व करण्याचे स्विकार केले आहे आणि जडेजाला त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याची परवानगी दिली आहे,” असे म्हटले आहे.

महेंद्रसिंग धोनीने आयपीएल १५ सुरू होण्याच्या काही दिवस आधी कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्याच्या जागी रवींद्र जडेजाला ही जबाबदारी देण्यात आली. जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाला आठ पैकी सहा सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पहिला विजय मिळवला. तर दुसरा विजय मुंबई इंडियन्सविरुद्ध मिळवला होता.