कर्णधार संजू सॅमसन रिटायर हर्ट होऊन परतल्याने तसंच सुपर ओव्हरमध्येही खेळायला न उतरल्याने राजस्थान रॉयल्सची चिंता वाढली आहे. बुधवारी झालेल्या लढतीत दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये राजस्थानवर थरारक विजय मिळवला. पराभवासह राजस्थानला संजू सॅमसनच्या दुखापतीची चिंता असणार आहे.

१८९ धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांनी राजस्थानला धावांची खणखणीत सलामी दिली. विपराज निगमच्या षटकात चौकार आणि षटकार वसूल केल्यानंतर संजूला दुखापतीचा त्रास जाणवू लागला. फिजिओंनी मैदानात धाव घेत पाहणी केली आणि उपचारही केले. संजूने गोळी घेऊन पुन्हा खेळायला सुरुवात केली. मात्र एका चेंडूनंतर त्रास पुन्हा जाणवू लागल्याने त्याने ड्रेसिंगरुममध्ये परतण्याचा निर्णय घेतला. संजूनंतर नितीश राणाने अर्धशतकी खेळी करत राजस्थानच्या विजयाच्या आशा जिवंत राखल्या. शिमोरन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांनी विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले पण ते अपुरे ठरले आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

सुपर ओव्हरसाठी संजू खेळायला उतरेल अशी राजस्थानच्या चाहत्यांना आशा होती मात्र तसं झालं नाही. सुपर ओव्हरमध्ये शिमोरन हेटमायर, रियान पराग आणि यशस्वी जैस्वाल यांनी फलंदाजी केली. सामन्यानंतर बोलताना संजूने दुखापतीसंदर्भात सांगितलं. संजू म्हणाला, ‘आता बरं वाटत आहे. रिटायर हर्ट झाल्यानंतर पुन्हा मैदानात खेळण्यासाठी तयार नव्हतो. आधीपेक्षा बराच बरा आहे. दिल्लीचा संघ उत्तम खेळ करून आम्हाला दडपणाखाली आणणार हे पक्कं होतं. पण आम्ही चांगला खेळ केला. आम्ही जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. आम्ही या धावसंख्येचा पाठलाग करू असा विश्वास होता. पॉवरप्लेमध्ये आम्ही आक्रमक सुरुवात केली. पण मिचेल स्टार्क आमच्या विजयातला अडथळा ठरला. त्याने २०व्या षटकात आणि सुपर ओव्हरमध्येही सर्वोत्तम गोलंदाजी केली. संदीप अनुभवी खेळाडू आहे. बहुतांशवेळेस तोच हाणामारीच्या षटकात गोलंदाजी करतो. आज त्याचा दिवस नव्हता. विजय मिळाला असता तर संघाचा आत्मविश्वास उंचावला असता पण आम्ही जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली याचं समाधान असेल’.

दरम्यान हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे संजू यंदाच्या हंगामात सुरुवातीचे तीन सामने विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळला होता. रियान परागने या तीन सामन्यात राजस्थानचं नेतृत्व केलं. ध्रुव जुरेलने यष्टीरक्षणाची धुरा सांभाळली. राजस्थानने ७ पैकी ५ सामने गमावले आहेत. विजयपथावर परतत प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी राजस्थानला दमदार खेळ करावा लागेल. त्यासाठी संजू संघात असणंही महत्त्वाचं आहे.