Rohit Sharma Statement On Suryakumar Yadav : वानखेडे मैदानात शुक्रवारी झालेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामन्यात मुंबईने २७ धावांनी विजय मिळवला. मुंबईने गुजरातला विजयासाठी २१९ धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु, गुजरातला २० षटकांत १९१ धावांपर्यंतच मजल मारता आल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईसाठी स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत १०३ धावांची नाबाद शतकी खेळी केली. सूर्यकुमारने आयपीएलमधील पहिलं शतक ठोकल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तीन नंबरवर फलंदाजी करण्याबाबत चर्चा झाल्यानंतर सूर्यकुमारने तो निर्णय घेतला आणि आक्रमक फलंदाजी करून आयपीएलमधील पहिलं शतक ठोकलं. रोहितने याबाबत खुलासा करत सूर्यकुमारने कोणती भूमिका घेतली, याबाबत प्रतिक्रिया दिली. रोहित शर्मा म्हणाला, आम्हाला फलंदाजीत लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन ठेवायचं होतं. पंरतू, सूर्यकुमार यादवने स्वत:वर मोठा आत्मविश्वास ठेवला आणि तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्ससाठी हा विजय खूप महत्वाचा होता. प्रथम फलंदाजी करून आम्ही धावा केल्या आणि त्यानंतर टार्गेटला डिफेंड केलं. आम्ही सतत विकेट घेत राहिलो आणि या फॉर्मेटमध्ये तुम्हाला अशा गोष्टी कराव्या लागतात. सूर्यकुमारला आत्मविश्वास मिळाला आहे. आम्ही राईट-लेफ्ट कॉम्बिनेशन ठेवणार होतो. पण सूर्याने सांगितलं की, मला मैदानात जायचं आहे. त्याच्याकडे अशाप्रकारचा आत्मविश्वास आला आहे. प्रत्येक सामन्यात तो नव्याने सुरुवात करण्यासाठी सज्ज असतो. मागील सामन्यात काय घडलं, याबाबत तो विचार करत नाही. अनेकदा तुम्ही जे केलं आहे, याबाबत अभिमान वाटतो. पण सूर्यकुमार यादव वेगळा आहे." नक्की वाचा - Video: सूर्यकुमार यादवचा ‘तो’ शॉट पाहून क्रिकेटचा देवही झाला आश्चर्यचकित, सचिन ट्वीट करत म्हणाला, “वर्ल्ड क्रिकेटमध्ये कुणीही…” रोहित शर्मा आणि ईशान किशनने पॉवर प्ले मध्ये धडाकेबाज फलंदाजी करून मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, राशिद खानच्या गोलंदाजीवर मुंबईचे दोन्ही सलामीवीर बाद झाले आणि मुंबईला मोठा धक्का बसला. त्यानंतर मैदानात उतरलेला नेहर वढेराही राशिदच्या गोलंदाजीचा शिकार झाला. परंतु, कमालीचा फॉर्ममध्ये असलेला सूर्युकमार यादव पुन्हा एकदा तळपला आणि मुंबईच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. तसंच मुंबईचा नवखा फलंदाज विष्णू विनोदनेही अप्रतिम फलंदाजी केली. मुंबईसाठी रोहित शर्मा (२९), ईशान किशन (३१), विष्णू विनोद (३०), नेहल वढेरा (१५), टीम डेव्हिड (५) धावा करून बाद झाला. पण त्यानंतर वानखेडे मैदानात सूर्यकुमार यादवचं वादळ आलं आणि मुंबईची धावसंख्या वाऱ्याच्या वेगाप्रमाणे वाढली.