आयपीएल २०२२ च्या (IPL 2022) १५ व्या हंगामात शुक्रवारी (२२ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि राजस्थान रॉयल्समध्ये (RR) तुल्यबळ लढत झाली. मात्र, हा सामना खेळापेक्षा अधिक वादामुळेच चर्चेत राहिला. सामन्याच्या शेवटच्या षटकात नॉ बॉलवरून दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत आणि अंपायरमध्ये वाद सुरू झाला. याचवेळी मैदानात धावपट्टीवर राजस्थानचा गोलंदाज युजवेंद्र चहलने दिल्लीचा फलंदाज कुलदीप यादवला मान पकडून लोटल्याचं दिसलं. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

ऋषभ पंत नो बॉलवरून आक्रमक झालेला असताना युजवेंद्र चहलने कुलदीप यादवची मान पकडून त्याला का धक्का दिला, त्यावेळी दोघांमध्ये काय बोलणं झालं असेल असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहेत. असं असलं तरी चहल आणि यादव यांच्यातील हा संपूर्ण प्रकार मैत्रीपूर्ण नात्यातून चेष्टामस्करी म्हणून झाल्याचंही व्हिडीओत स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळेच एकीकडे तणाव निर्माण झाला असताना चहल आणि यादवच्या या चेष्टामस्करीचा विषय चर्चेत आहे.

नेमकं काय झालं?

या सामन्यात अखेरच्या षटकात तिसरा चेंडू कंबरेच्या वरती टाकल्याचा आरोप करत दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत संतापला. तसेच त्याने हा चेंडू ‘नो बॉल’ देण्याची आक्रमक मागणी केली. प्रकरण इतकं वाढलं की ऋषभ पंतने मैदानावरील दिल्लीच्या फलंदाजांना थेट मैदानाबाहेर येण्यास सांगितले. यावेळी मैदानावर रोवमॅन पॉवेल आणि कुलदीप यादव हे होते.

हेही वाचा : IPL 2022 : लाइव्ह सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा; ३ चेंडूत १८ धावा हव्या असताना सलग तीन षटकार लगावणाऱ्याला पंतने परत बोलवलं अन्…

वादानंतर वातावरण कमालीचं तणावपूर्ण झालं आणि कुलदीप यादवला काय निर्णय घ्यावा हे समजलं नाही. त्याचवेळी राजस्थानचा गोलंदाज युजवेंद्र चहलने कुलदीपला चेष्टामस्करीच्या रुपात मान पकडून ढकललं, तसेच खेळायला सांगितलं.