बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्याच्या तब्बल साडेसहा वर्षांनंतर पुन्हा एकदा जगमोहन दालमियांकडे बीसीआयच्या अंतरिम अध्यक्षपदाची धुरा हाती आल्यानंतर हा त्यांचा व्यक्तीगत विजय नसल्याचे दालमियांचे म्हणणे आहे. स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणावरून मलिन झालेली बीसीसीआयची प्रतिमा स्वच्छ करण्याची जबाबदारी म्हणजे एक आव्हान असल्याप्रमाणे दालमिया याकडे बघत आहेत.
दालमिया यांना डिसेंबर २००६ रोजी विश्वचषक-१९९६ च्या क्रिकेट मालिकांमध्ये गैरव्यवहार केल्याबद्दल बंगाल क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदावरून राजीनामा द्यावा लागला होता. त्याबद्दल बोलताना दालमिया म्हणाले, “मी निर्दोष असल्याचे सिद्ध केले आहे. क्रिकेट सध्या कठीण परिस्थिशी सामना करत आहे. मी ठरविलेली कामे पुर्ण करण्यावर विश्वास ठेवतो”
चेन्नईतील बीसीसीआयच्या तातडीच्या बैठकीवरून परत आल्यानंतर दालमिया पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “हा व्यक्तीकेंद्रीत विजय नसून, क्रिकेटच्या मलिन झालेल्या प्रतिमेला स्वच्छ करणे ही माझी प्राथमिकता असेल आणि त्यासाठी माझ्याकडे वेळही कमी आहे. त्यासाठी जलदरित्या काम करावे लागणार आहे.
“क्रिकेट हा एक फिक्सिंग नाही, तर स्वच्छ खेळ असल्याचे मला सिद्ध करावे लागणार आहे. क्रिकेटवरचा लोकांनी गमावलेला विश्वास पुन्हा मिळविण्याची गरज आहे” असेही ते पुढे म्हणाले. आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणावरून क्रिकेटप्रेमींच्या मनात बीसीसीआय आणि क्रिकेटवरच्या विश्वासला तडा गेलाय. तो परत मिळविण्यासाठी दालमिया यांच्यावर बीसीसीआयची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.