यंदाचं वर्ष भारताचा जलदगती गोलंदाज आणि भारताच्या भात्यातलं ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जाणारा जसप्रीत बुमराह याच्यासाठी काही फारसं चांगलं जाताना दिसत नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं एक कसोटी सामना जिंकला. त्याव्यतिरिक्त दोन कसोटी सामन्यातही त्यानं नेतृत्व केलं. पण तेव्हापासून बुमराहच्या सातत्याला घरघर लागली. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असणाऱ्या बुमराहला या वर्षी एकही कसोटी मालिका पूर्ण खेळता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर बुमराहचं उपकर्णधारपद कायमचं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

येत्या जून महिन्यात भारताचा कसोटी संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत पाच सामने खेळवले जाणार आहेत. पण वैयक्तिक कारणांमुळे बुमराहला या सर्व पाच सामन्यांत खेळता येणार नसल्याचं स्पष्ट झालंय. या पार्श्वभूमीवर आता निवड समितीकडून कसोटी उपकर्णधारपदासाठी नव्या नावाचा विचार केला जात असल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

“आम्हाला असा खेळाडू हवाय, जो मालिकेतले सर्व पाचही सामने खेळू शकेल आणि उपकर्णधारपदासाठी योग्य असेल. बुमराह सर्व पाच कसोटी सामने खेळू शकणार नाहीये. आम्हाला वेगवेगळ्या सामन्यांसाठी वेगवेगळे उपकर्णधार नेमायचे नाहीयेत. कर्णधार व उपकर्णधार हे कायम असणं आणि त्यांनी मालिकेतील सर्व सामने खेळणं संघाच्या दृष्टीने योग्य ठरेल”, असं बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितल्याचं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

शुभमन गिल किंवा रिषभ पंत?

दरम्यान, कसोटी संघाच्या उपकर्णधारपदासाठी शुभमन गिल (२५) किंवा रिषभ पंत (२७) यांच्या नावाचा विचार निवड समिती करू शकते. निवड समितीला असा चेहरा या पदासाठी हवाय, ज्याला पुढे उपकर्णधार म्हणून तयार केलं जाऊ शकतं. सध्याच्या संघात गिल व पंत हे दोन खेळाडूच या निकषांना पात्र ठरतात. याव्यतिरिक्त विराट कोहली, रवींद्र जडेजा किंवा के. एल. राहुल हे तीन नियमित कसोटी खेळाडू त्यांच्या तिशीत आहेत, तर यशस्वी जयस्वाल अवघ्या २३ वर्षांचा आहे.

बुमराहच्या दुखापतीची चिंता

बीसीसीआयला बुमराहच्या दुखापतीचीदेखील चिंता असून त्याचा परिणाम त्याच्या करिअरवर होत असल्याचं दिसून येत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सिडनीमधील कसोटी सामन्यादरम्यान त्याला पाठिच्या दुखापतीचा सामना करावा लागला. त्यानंतर पुढचे तीन महिने बुमराह क्रिकेटपासून लांब राहिला. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्याला खेळता आलं नाही. शिवाय, आयपीएलचेही पहिले काही सामने त्याला खेळता आले नाहीत.

याआधीही बुमराहच्या पाठिच्या दुखण्यामुळे संघनिवडीचा पेच निर्माण झाला आहे. २०२२ मध्ये याच दुखण्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्याला जवळपास ११ महिने क्रिकेटपासून लांब राहावं लागलं होतं. यामुळे त्याला त्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेतही खेळता आलं नाही.

रवी शास्त्री म्हणतात, बुमराहला वेळ द्या!

दरम्यान, भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बुमराहची काळजी घेण्याचा सल्ला बीसीसीआयला दिला आहे. “मी त्याच्याबद्दल खूप काळजीपूर्वक निर्णय घेतले असते. मी त्याला एका वेळी दोनच कसोटी सामन्यांमध्ये खेळवलं असतं आणि नंतर ब्रेक दिला असता. थोडक्यात त्याला मालिकेत चारच कसोटी सामने खेळवा. पहिल्या सामन्यात त्याची कामगिरी उत्तम झाली की तुम्हाला वाटू लागतं की त्याला पूर्ण पाच सामने खेळवावं. पण असं करूनच त्याच्यावरचा ताण वाढला आहे. आपल्याला ब्रेक हवाय, हे सांगण्याची संधी आपण त्याला द्यायला हवी”, असं रवी शास्त्री यांनी एका कार्यक्रमात नमूद केलं आहे.