India vs Pakistan, Icc T20 World Cup 2026: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेला येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. तर सर्वात महत्वाचा सामना म्हणजे १५ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. पण पाकिस्तानने स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिल्याने ब्रॉडकास्टर्सचं मोठं नुकसान होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयामुळे अधिकृत ब्रॉडकास्टर जियोस्टार कडून पाकिस्तानवर क्रिकेट बोर्डावर कायदेशीर कारवाई होण्याची टांगती तलवार आहे.
आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन भारत आणि श्रीलंकेत केले जाणार आहेत. पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. पाकिस्तानने इतर संघाविरुद्ध खेळण्यास होकार दिला आहे. तर भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यावर बहिष्कार का टाकला, याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला अद्यापही कारण सांगितलेलं नाही.भारत – पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं मोठं नुकसान होणार आहे. तर जियो हॉटस्टारकडून कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते.
सामना न झाल्यास ब्रॉडकास्टर्सचं मोठं नुकसान होणार आहे. या नुकसानाची भरपाई पाकिस्तानकडून वसूल केली जाऊ शकते. याशिवाय, पाकिस्तानला मिळणारा वार्षिक महसूल हिस्सा, जो अंदाजे ३५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २९० कोटी रुपये) आहे, तो आयसीसी रोखून धरू शकते. या पैशांचा वापर हा ब्रॉडकास्टर्सचं होणारं नुकसान भरून काढण्यासाठी केला जाऊ शकतो. अशी शक्यता पीसीबीच्या सूत्रांनी वर्तवली आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सीमांतर्गत वाद आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवली जात नाही. दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येत असतात. पण द्विपक्षीय मालिका वगळता इतर स्पर्धांसाठीही भारताने पाकिस्तानात जाण्यास, तर पाकिस्तानने भारतात येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दोन्ही संघांचे सामने हे न्यूट्रल वेन्यूवर खेळवले जातात. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड होणाऱ्या नुकसानाची भरपाई करण्यास होकार देणार, की हा तोटा टाळण्यासाठी भारताविरुद्ध खेळण्यास होकार देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

