विजय स्पोर्ट्स (काल्हेर), श्री समर्थ (कालवार), एन्जॉय (गुंदवली) आणि विठ्ठल (ठाणे) या संघांनी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पध्रेत विजयी घोडदौड कायम राखली. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, श्री विठ्ठल क्रीडा मंडळातर्फे आणि अश्वमेध युवा प्रतिष्ठान लोकमान्य नगर यांच्या विद्यमाने या स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

कुमार गटाच्या सामान्यात विजय स्पोर्ट्सने ५-५ चढायाच्या जादा डावात नंदकुमार, बदलापूरचा कडवा प्रतिकार २८-२७ असा मोडून काढला. अत्यंत चुरशीच्या लढतीत पूर्ण डावात सामना २२-२२ असा बरोबरीत सुटल्यामुळे ५-५ चढायांच्या जादा डावाचा खेळ झाला. विजय स्पोर्ट्सच्या अक्षय पाटील यांनी उत्कृष्ट पकडी करीत व चढाईत बोनस गुणांसह एक गडी बाद करीत सामाना आपल्या नावे केला. त्याला मोनीष व जितेश पाटील यांची उत्तम साथ मिळाली.

श्री समर्थने कल्याणच्या ओम संघाचे आव्हान १७-१५ असे मोडून काढले. मध्यंतराला ०९-१२ अशा पिछाडीवर असलेल्या श्री समर्थच्या करण, दर्शन म्हात्रे यांनी चौफेर चढाया व पकडी करीत सामना आपल्या बाजूने झुकवला एन्जॉय स्पोर्ट्सने जय बजरंग वासिंदचा १०-९ अशा रोमहर्षक सामन्यात पराभव केला. मध्यंतराला सामना २-२ अशा समान गुण संख्येवर असताना एन्जॉयच्या प्रजेश, प्रणीत म्हात्रे यांनी आपला खेळ उंचावत संघाला विजय मिळवून दिला. श्री विठ्ठल संघाने हुतात्मा शांताराम कालवारचा २७-१९ असा सहज पराभव केला. मध्यंतराला दोन्ही संघ ९-९ अशा समान गुणांवर खेळत होते. मध्यंतरानंतर अनिकेत जाधव यांच्या चौफेर चढाया, तर चिन्मय गुरव यांच्या उत्तम पकडीच्या जोरावर विठ्ठल संघाने सामाना आपल्या बाजूने झुकवला.