केदार जाधवचे नाबाद शतक

महाराष्ट्र व ओदिशा यांच्यातील रणजी क्रिकेट सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णित राहिला. मात्र पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर महाराष्ट्राने तीन गुणांची कमाई केली. शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या केदार जाधव याने नाबाद शतक टोलवित शानदार कामगिरी केली.
महाराष्ट्राने शनिवारीच पहिल्या डावात १४ धावांची आघाडी मिळविली होती. ३ बाद १५६ धावसंख्येवर महाराष्ट्राने दुसरा डाव पुढे सुरू केला. जाधव व अंकित बावणे यांनी चौथ्या विकेटसाठी ११३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. बावणे याने शैलीदार ४४ धावा केल्या. त्याच्या जागी आलेल्या राहुल त्रिपाठी (नाबाद १७) याच्या साथीत अखंडित ५१ धावांची भागीदारी केली. केदार याने शतक पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्राने ४ बाद २८९ धावांवर दुसरा डाव घोषित केला. केदार याने २०७ मिनिटांत १५ चौकारांसह नाबाद १०० धावा केल्या.
विजयासाठी ३०४ धावांचे आव्हान मिळालेल्या ओदिशाने दुसऱ्या डावात ५५ षटकांत ५ बाद १२९ धावा केल्या. त्यानंतर सामना अनिर्णित म्हणून जाहीर करण्यात आला. पहिल्या डावात सहा बळी घेणाऱ्या महाराष्ट्राचा श्रीकांत मुंडे याला सामनावीर पुरस्कार मिळाला.

संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र २८१ व ९२.१ षटकांत ४ बाद २८९ घोषित (स्वप्निल गुगळे ७१, केदार जाधव नाबाद १००, अंकित बावणे ४४, बसंत मोहंती २/५८) ओदिशा २६७ व ५५ षटकांत ५ बाद १२९ (गिरिजाकुमार राऊत ३१, अनुराग सरंगी २८, प्रतिक दास नाबाद २६, अनुपम संकलेचा २/११)