Ajinkya Rahane Reaction On Rohit Sharma Test Retirement: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहे. काही महिन्यांपूर्वी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना रोहितने सांगितलं होतं की, मी अजून तरी निवृत्तीचा विचार केलेला नाही. मग अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची स्टोरी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या निर्णयामुळे भारताचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे देखील आश्चर्यचकीत झाला आहे.

अजिंक्य रहाणे कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार आहे. बुधवारी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला २ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे पत्रकार परिषदेत आला. त्यावेळी अजिंक्य रहाणेला रोहितच्या निवृत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला.

रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे दोघेही मुंबईकडून क्रिकेट खेळले आहेत. दोघेही चांगले मित्र आहेत. मात्र, रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे, याची कल्पना अजिंक्य रहाणेला नव्हती. रोहितच्या निवृत्तीबाबत बोलताना रहाणे म्हणाला, ” रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, हे मला माहित नव्हते. मला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. रोहीतने कसोटी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मला त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत. रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरूवात पाचव्या सहाव्या क्रमांकावर खेळताना केली होती. पण, त्यानंतर त्याने सलामीवीर म्हणून आपला दबदबा निर्माण केला आहे. “

मी त्याला कॉल करेल….

तसेच तो पुढे म्हणाला, ” रोहितला नेहमी मुक्तपणे खेळायला आवडायचं आणि संघातील खेळाडूंनीही मुक्तपणे खेळावं अशी त्याची ईच्छा असायची. मी ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर त्याला मॅसेज करेल किंवा कॉल करेल. अविश्वसनीय कसोटी कारकिर्दीसाठी मी त्याचे अभिनंदन करतो.”

येत्या काही दिवसांत भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, गेल्या काही सामन्यातील कामगिरी पाहता रोहितला या संघात मिळणार नव्हते, अशी चर्चा सुरू होती. निवडकर्त्यांना आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी नवा कर्णधार हवा होता.

त्यामुळे रोहितने कसोटी क्रिकेटला रामराम केला असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, रोहित वनडे क्रिकेट खेळणं सुरू ठेवणार आहे. आता कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करण्यासाठी शुबमन गिल आणि ऋषभ पंतच्या नावाची चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. आता ही जबाबदारी कोणाला मिळणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.