राष्ट्रीय अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत बुधवारी महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीत महाराष्ट्राच्या कोलम जगदाळे (१६:०१.४३ सेकंद) आणि संजीवनी जाधव (१६:१९.१८ सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक कमावले. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बुधवारी सुरू झालेल्या स्पर्धेत रेल्वेच्या पारुल चौधरीने (१५:५९.६९ सेकंद) सुवर्णपदक पटकावले. २२ वर्षीय कोमलने पारुलला आव्हान दिले, परंतु तिला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीमध्ये रेल्वेच्या अभिषेक पालने सुवर्णपदक मिळवले, तर धर्मेंदर आणि अजय कुमार या सेना दलाच्या स्पर्धकांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली. पोल व्होल्टमध्ये तमिळनाडूच्या पवित्रा वेंकटेशने सुवर्णपदक मिळवले, तर रेल्वेच्या मारिया जेसनने रौप्य आणि कृष्णा रशनने कांस्यपदक मिळवले.