भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून (केकेआर) प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी न मिळाल्याबद्दल टीम मॅनेजमेंटवर मोठे आरोप केले आहेत. कुलदीप म्हणाला, ”संघात संवादाचा अभाव आहे. खेळाडूला खेळण्याची संधी का मिळत नाही आणि त्याला कोणत्या सुधारणा कराव्या लागतात हे त्याला सांगितले जात नाही.”

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या यूट्यूब चॅनेलवर एका मुलाखतीदरम्यान कुलदीप यादव म्हणाला, ”खेळाडूला संघामधून का वगळण्यात आले आहे हे देखील त्याला माहीत नसते. जर प्रशिक्षकाने आधी तुमच्यासोबत काम केले असेल आणि तुमच्याशी दीर्घकाळ जुळले असेल, तर ते तुम्हाला अधिक चांगले समजून घेतील. पण जेव्हा संवाद कमकुवत होतो तेव्हा अनेक समस्या असतात. तुम्ही खेळत आहात का किंवा संघ तुमच्याकडून काय अपेक्षा करतो, हे तुम्हाला माहीत नसते.”

हेही वाचा – २००७च्या वर्ल्डकपला धोनीनं पाकिस्तानविरुद्ध जे केलं ते पाहून तुम्हीही म्हणाल, ‘‘नादखुळाच!”

कुलदीप यादव पुढे म्हणला, “कधीकधी तुम्हाला वाटते की तुम्ही खेळायला पात्र आहात आणि संघासाठी सामने जिंकू शकता, पण तुम्हाला का वगळण्यात आले याचे कारण माहीत नसते. टीम मॅनेजमेंट फक्त दोन महिन्यांसाठी त्याची योजना बनवते. आणि यामुळे अडचणी वाढतात.”

”भारतीय संघात आपण संघात का नाही याबद्दल बोलले जाते, परंतु केकेआर फ्रेंचायझीच्या बाबतीत असे होत नाही. मला आठवते की आयपीएलपूर्वी टीम मॅनेजमेंटशी मी बोललो होतो, पण सामन्यादरम्यान माझ्याशी याबद्दल कोणीही बोलले नव्हते”, असेही कुलदीप म्हणाला.