आठवडय़ाची मुलाखत: पारस म्हाम्ब्रे, गोलंदाजी प्रशिक्षक

भाराताच्या युवा शिलेदारांनी काही दिवसांपूर्वीच विश्वविजयाचा चौकार लगावला. कर्णधार पृथ्वी शॉ आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबरोबर गोलंदाजीचे प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांचाही या विजयात मोलाचा वाटा होता. या विश्वचषकाची त्यांनी तयारी कशी केली, खेळाडूंना कसे मार्गदर्शन केले याबाबत म्हाम्ब्रे यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी या युवा खेळाडूंची ही तर सुरुवात आहे, यापुढे त्यांना अजून बरीच ध्येय गाठायची आहेत, असे मत व्यक्त केले.

  • प्रशिक्षणाला तुम्ही कधी पासून सुरुवात केली आणि या युवा खेळाडूंवर कसे संस्कार केले?

क्रिकेट कारकिर्दीच्या अखेरच्या दिवसांपासून म्हणजेच २००२-०३ पासून मी प्रशिक्षण करायला सुरुवात केली होती. युवा खेळाडूंना तुम्हाला थोडा जास्त वेळ द्यावा लागतो. त्यांना समजून घ्यावे लागते. त्यांच्याकडे जास्त अनुभव नसतो, त्यामुळे संयम बाळगून त्यांच्याशी संवाद साधावा लागतो. ते एखाद्या गोष्टीचा कसा विचार करतात, हे तुम्हाला जाणून घ्यावे लागते.

  • या संघातील गोलंदाज भारतातल्या विविध ठिकाणांहून आले होते, त्यांची गोलंदाजी पाहून कसे मार्गदर्शन केले?

विश्वचषकाच्या प्रक्रीयेला दीड वर्षांपूर्वीपासूनच सुरुवात झाली. त्यांचे सामने पाहावे लागतात, त्यामधून काही गोलंदाज निवडावे लागतात. किती वेगवान आणि फिरकी गोलंदाज निवडायचे हे ठरवावे लागते. या विश्वचषकाच्या संघात कोण गोलंदाज बसू शकतात, हे पहावे लागते. गोलंदाजांच्या तंत्राबाबत बदल स्पर्धेदरम्यान करू शकत नाही. त्यामुळे हे बदल स्पर्धेच्या काही दिवसांपूर्वीच करावे लागतात. तांत्रिक गोष्टींबरोबर मानसीकत संतुलन त्यांचे योग्य कस ठेवता येईल, हेदेखील पहावे लागते. त्यांचे बलस्थान आणि कच्चेदुवे बघावे लागतात. कोणत्या गोष्टी ते अजून चांगल्यापद्धतीने करू शकतात, हे बघावे लागते. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्यांच्याकडून चांगला सराव करून घेतला होता. ट्रेनर आणि फिजिओ यांचाही यामध्ये महत्वाचा वाटा असतो.

  • या विश्वचषकात गोलंदजीमध्येही सातत्य पाहायला मिळाले, तुम्ही यासाठी काय रणनिती वापरली होती?

प्रत्येक प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचा खेळ आम्ही पाहत होतो. त्यानुसार आम्ही आमची रणनिती आखत होतो. काही वेळा त्यांच्या कामगिरीचे ‘फूटेज’ उपलब्ध नव्हतेही. पण तरीही आम्ही चांगली गोलंदाजी कशी करता येईल, याकडे जास्तीत जास्त लक्ष दिले.

  • या संघात चांगले वेगवान गोलंदाज होते. यापुढे त्यांच्यासमोर काय आव्हान असतील?

लोकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा फार वाढल्या आहेत. ज्यापद्धतीने नागरकोटी, इशान पोरेल, शिवम मावी या तिघांनी विश्वचषकात चांगली कामगिरी केली. कधी कधी या गोलंदांना भारताकडून खेळवायला हवे, असेही म्हटले जाते. पण माझ्यामते त्यांची कारकिर्द इथून सुरु झाली आहे. यापुढे किमान त्यांना २-३ वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला हवे. त्यानंतर त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. यापुढे कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेट त्यांना खेळायला मिळेल. माझ्यामते २-३ वर्षांनंतर कोणत्या गोलंदाजांची प्रगती झाली हे आपल्याला समजू शकेल. त्याचबरोबर प्रत्येक राज्य संघटनांनाही या खेळाडूंची जबाबदारी घ्यावी लागेल.

  • राहुल द्रविड हे एक महान फलंदाज होते, पण एक प्रशिक्षक म्हणून ते कसे वाटले?

गेल्या ३-४ वर्षांपासून मी त्यांच्याबरोबर काम करत आहे. आमच्या दोघांमध्ये एक चांगले नाते निर्माण झाले आहे. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले आहे. ते आपले अनुभव सांगतात आणि या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात. आमच्यामध्ये नेहमीच संवाद असतो. त्यामुळे प्रत्येकाला आम्ही चांगले ओळखतो. कोणाची काय गरज आहे, हे आम्हाला कळते. त्यामुळे एक संघ म्हणून आमची चांगली बांधणी झाली होती. ते प्रत्येकाला समान न्याय देतात, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.

  • एखाद्या मिशनची तयारी करत असताना काही गोष्टी ठरवल्या जातात. एखादा विचार, वाक्य किंवा एखादे गाणे यांचाही कधी कधी उपयोग केला जातो. या मिशनची तयारी करताना अशा काही गोष्टी होत्या का?

त्याबाबतीत आम्ही रटाळ सहाय्यक असू शकतो. दीड वर्षांपूर्वी विश्वचषकाची प्रक्रीया सुरु झाली. त्यावेळी प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीत सुधारणा होत आहे की नाही, हे आम्ही पाहत होतो. त्याचबरोबर एक संघ म्हणून चांगला समन्वय कसा साधता येईल, याकडेही आम्ही लक्ष दिले. खेळात जिंकणे किंवा हरणे होतच असते, तो खेळाचा एक भाग असतो. कधी कधी प्रतिस्पर्धी तुमच्यापेक्षा चांगला खेळ करतात आणि सामना जिंकतात, असेही  होते. त्यामुळे आम्ही त्यावर जास्त भर दिला नाही. प्रत्येक खेळाडू आणि संघाची कामगिरी कशी उंचावेल, हे आमचे ध्येय होते. युवा क्रिकेट हा खेळाचा पाया आहे. या स्तरापासून खेळाडू पुढे जात असतात. त्यामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार कसे करता येतील, मार्गदर्शन कसे करता येईल, या गोष्टींवर आम्ही जास्त भर दिला. जर आम्ही ही प्रक्रीया कायम ठेवली तर निकाल चांगलेच लागतील, हे आम्हाला माहिती होते. तुम्ही जेव्हा भारताचे प्रतिनिधीत्व करता तेव्हा देशाचे नाव खराब होता कामा नये, ही भावना कायम मनात होती.

  • विश्वचषक जिंकल्यावर बीसीसीआयने रोख पारितोषिक जाहीर केले. पण त्यामध्ये असामनता असल्याबद्दल द्रविड यांनी वक्तव्य केले, याबद्दल तुम्हाला काय वाटते?

हा द्रविड यांचा मोठेपणा आहे. हा नक्कीच सोपा निर्णय नव्हता. या निर्णयाने द्रविड हे एक व्यक्ती म्हणून कसे आहात, हे समजता येऊ शकते. त्यावरून तुम्हाला हे समजता येऊ शकते, की त्यांनी आम्हाला कशी वागणूक दिली असेल. ही लोकांसाठी छोटी गोष्ट असेलही. यामध्ये फक्त पैशांचा विचार नाही, तर समानतेचा आहे. ही व्यक्ती फक्त पैशांमागे धावत नाही तर त्यांना क्रिकेटला योगदान द्यायचे आहे, हे त्यांच्या मनात आहे. स्वत:बद्दल विचार न करता संघाचा विचार करणे, हे महत्वाचे असते आणि हे त्यांच्या या वक्तव्यामधून दिसून आले.