करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा साठावा वर्धापनदिन अर्थात ‘हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन’ आज साधेपणानेच साजरा होत आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १ मे १९६० रोजी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला होता. या घटनेला आज ६० वर्षे पूर्ण झाली. याच पार्श्वभूमीवर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने साऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

लाजिरवाण्या ११ खेळाडूंच्या यादीत मुंबईकर अजित आगरकरचं नाव; जाणकार, चाहते संतापले

‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकर याने एक खास फोटो पोस्ट केला. त्या फोटोमध्ये त्याने झकासपैकी महाराष्ट्राची ओळख असलेला मराठमोळ्या पद्धतीचा फेटा बांधला आहे. तो खास फोटो ट्विट करत त्याने सर्वांना महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! जय महाराष्ट्र!’, असा संदेश त्याने फोटोवर लिहिला आहे. तसेच त्याने त्याच्या ट्विटमध्ये #MaharashtraDay हा हॅशटॅगदेखील वापरला आहे.

भारतीय क्रीडाक्षेत्राला धक्का! यजमानपदाचे हक्क गमावण्याची नामुष्की

याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी ट्विटवरुन महाराष्ट्रातील जनतेला मराठीमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. देशातील जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे असं मोदींनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. “महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातल्या बंधू- भगिनींना माझ्या शुभेच्छा. देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे. येणाऱ्या काळात राज्याच्या प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र!”, असं ट्विट मोदींनी केलं आहे.

अष्टपैलू व्यक्तिमत्वाला रवी शास्त्रींकडून श्रद्धांजली

संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात १०५ हुतात्म्यांचे बलिदान गेल्याने महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्र दिनाकडे जिव्हाळय़ाने व भावनिकदृष्टय़ा पाहात आली आहे. त्यावेळी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा निर्णय करून घेण्यात यशवंतराव चव्हाण यशस्वी झाले होते. दिल्लीतील प्रमुख नेत्यांची मान्यता मिळाल्याने १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यावेळच्या ऐतिहासिक कार्यक्रमात यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणून त्याचे पूजन केले होते. अशा या ऐतिहासिक क्षणाचा आज हीरक महोत्सव असूनही महाराष्ट्र दिन म्हणून दरवर्षी दिमाखात साजरा होणारा हा दिवस सध्या करोना विषाणूच्या ग्रहणामुळे अतिशय साधेपणानेच साजरा होताना दिसत आहे.